नगराध्यक्ष पदाची आरक्षण सोडत मुंबईत होणार : 13 प्रभागात इच्छूकांच्या हालचालींना वेग
प्रतिनिधी/सातारा
राज्य निवडणूक आयोगाने दिलेल्या सुचनेनुसार शुक्रवारी सायंकाळी उशीरा आरक्षण सोडतीचा कार्यक्रम दि. 28 रोजी जाहीर करण्यात आलेला आहे. सातारा पालिकेच्या 13 प्रभागात ओबीसी आरक्षण पडणार असल्याने त्या प्रभागात इच्छूकांच्या नजरा लागून राहिल्या आहे. दरम्यान, नगराध्यक्षपदाचे आरक्षण सोडत मुंबईतूनच होणार असल्याने ओबीसी की सर्वसाधारण हे पडणार याकडेही लक्ष लगून राहिले आहे.
सातारा शहरात सातारा विकास आघाडी आणि नगरविकास आघाडीमध्ये खुल्या प्रवर्गातून ओबीसी समाजातील अनेक इच्छूक आरक्षण नसताना तयारी करत होते. आता तर ओबीसी आरक्षण जाहीर झाल्यानंतर त्यांच्याकरता ही नामी संधी चालून आली असून त्यांनी आरक्षण आपल्या प्रभागात पडणार हे गृहीत धरुन आणखी वेगाने कामाला लागले आहेत. शहरातील 50 जागा असून पैकी महिलांसाठी राखीव 25 असून उरलेल्या 25 मध्ये अनुसूचित जमातीसाठी 6 आणि जातीसाठी 1 अशा जागा आरक्षित अगोदरच आहेत. ओबीसी आरक्षण झाल्याने उरलेल्या 18 मध्ये 13 जागा या ओबीसीसाठी असणार आहेत. त्यामध्ये नेमका कोणता प्रभाग पडतोय याकडे आता आरक्षण सोडतीकडे लक्ष लागून राहिले आहे. दरम्यान, नगराध्यक्षपद हेही ओबीसी की सर्वसाधारण पडते याकडे लक्ष लागून राहिले आहे. गतवेळी नगराध्यक्षपदाचे आरक्षण हे सर्वसाधारण महिला हे होते आता नेमके काय पडेल त्या अनुषंगाने इच्छूकांच्या नजरा याकडे लागून राहिल्या आहेत.
हे ही वाचा : दह्याट येथे जमीन कसण्यास आडकाठी केल्याने दोघांवर अॅट्रॉसिटी दाखल
नेत्यांकडे उठ बस वाढली
आपल्यालाच नेत्यांनी उमेदवारीचे तिकीट दिले पाहिजे यासाठी इच्छूकांचे नेत्याकडे उठबस वाढवली आहे. नेत्यांच्यासमोर तर इच्छूक आहे असे दाखवण्याचे काम सध्या सुरु आहे. त्यामुळे दोन्ही आघाडय़ाकडे इच्छूकांची भल्ली मोठी गर्दी आहे. आपल्या वॉर्डातून हे हे इच्छूक आहेत. त्यांची तयारी सुरु आहे. वॉर्डात कार्यक्रम घेतले जात आहेत. नेत्यांच्या वाडय़ावर सतत चकरा असतात, अशी चर्चा सुरु आहे.