ऑनलाईन टीम / तरुण भारत :
रात्री घरी परतणाऱ्या नोकरदार महिलांच्या सुरक्षिततेसाठी पुणे शहरातील प्रमुख चौक, बसस्थानक आणि विशेषत: आयटी कंपन्यांच्या परिसरात विशेष सुरक्षा अभियान सुरू करण्यात आले आहे. शहरात नाकाबंदीसह रात्रीची पोलीस गस्त वाढविण्यात आली आहे.
परिमंडळ दोनच्या पोलिस उपायुक्त स्मार्तना पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, वानवडी परिसरात मंगळवारी (ता. 20) पहाटे एका संगणक अभियंता तरुणीवर रिक्षाचालकाने लैंगिक अत्याचार करण्याचा प्रयत्न केला होता. या घटनेची पोलीस आयुक्त रितेश कुमार यांनी गांभीर्याने दखल घेत तातडीने विशेष अभियान राबविण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार कालपासून या अभियानला सुरूवात झाली आहे. गुन्हे शाखा, वाहतूक शाखेसह शहरातील सर्व वरिष्ठ पोलीस निरीक्षकांना खबरदारी घेण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यानुसार शहरात नाकाबंदी आणि रात्रीची गस्त वाढविण्यात आली आहे. गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्यांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात येत आहे.
कॅब आणि रिक्षाने घरी जाणाऱ्या महिला प्रवाशांच्या सुरक्षिततेबाबत खबरदारी घेण्यात येत आहे. त्यासाठी स्वारगेट, शिवाजीनगर बसस्थानक आणि रेल्वे स्थानकावर महिला पोलिस कर्मचाऱ्यांचे विशेष पथक नेमण्यात आले आहे. हे पोलिस पथक रात्रभर तैनात असेल.