पुणे / प्रतिनिधी :
मराठा समाजाच्या अनेक नेत्यांनी सत्तेत काम केले, परंतु मराठयांना आरक्षण दिले नाही. आता ते नेमका कोणत्या प्रकारचा तोडगा आणतात हे पाहणे उत्सुकतेचे आहे. काँग्रेस याप्रकरणात राजकारण करताना दिसत आहे. काँग्रेस नेते यांनी मागणी सुरु केली की, ओबीसी म्हणून मराठयांना आरक्षण द्या. मनोज जरांडे पाटील यानिमित्ताने मराठा विरुध्द ओबीसी वितुष्ट वाढविण्याचा प्रयत्न केला जात आहे. नवीन गेम सुरु झाली की, मराठा विरुध्द वंजारी असा वाद देखील सुरु करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे असे मत वंचित बहुजन आघाडीचे नेते ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी बुधवारी मांडले.
आंबेडकर म्हणाले, सत्तेत असताना गरीब मराठयांकडे पाहिले गेले नाही व सरंजमशाही पध्दतीने निजामी मराठा पुरती सत्ता मर्यादित ठेवायची असे राजकारण आतापर्यंत खेळले गेले. ज्यावेळी गरीब मराठा आरक्षणबाबत आवाज उठवतो त्यावेळी तोडगे काढले जात आहेत. सत्तेत असताना मराठा आरक्षणाचा निर्णय का घेतला गेला नाही. दुसऱ्याला शहणपण शिकवणे सोपे असते. निजाम काळातील यादी मी तपासलेली नाही. माजी मुख्यमंत्री नारायण राणे समितीचा मराठा आरक्षण अहवाल न्यायालयाने फेटाळून लावला. कोकणात कुणबी-मराठा वाद आहे. अधिकृत डेटा न्यायालयासमोर आलाच नाही, त्यामुळे न्यायालयाने संबंधित अहवाल नाकारला. पंजाबराव देशमुख यांचे पुढाकाराने विर्दभातील जिल्हयात त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या सल्ल्याने कुणबी मराठा त्यांच्या कागदपत्रांवर लावून घेतले. ज्यांच्या कागदपत्रांवर कुणबी उल्लेख आहे, त्यांनाच फायदा मिळत आहे, असेही ते म्हणाले.