बसस्थानक बनले निराश्रीतांचे आश्रयस्थान : बस नियंत्रण कक्षात अधिकाऱयाची नियुक्ती केली नसल्याने होतेय गैरसोय : आवश्यक उपाययोजना राबविण्याची प्रवाशांची मागणी
प्रतिनिधी /बेळगाव
रेल्वेस्थानकासमोर असलेल्या कारवार बसस्थानकाचा स्मार्ट सिटी योजनेंतर्गत विकास करण्यात आला आहे. मात्र या बसस्थानकाच्या देखरेखीकडे तसेच प्रवाशांना आवश्यक सुविधा पुरविण्याकडे कॅन्टोन्मेंट बोर्ड आणि कर्नाटक परिवहन महामंडळाचे दुर्लक्ष झाले आहे. त्यामुळे बसस्थानक स्मार्ट बनविण्यासाठी खर्ची घालण्यात आलेला कोटीचा निधी पाण्यात गेला असल्याच्या प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत.
बसस्थानकाच्या आवारातील निवारा शेड आणि गाळय़ांची दुरवस्था झाल्याने स्मार्ट सिटी योजनेंतर्गत निधी खर्च करून बसस्थानकाचा विकास करण्यात आला आहे. प्रशस्त बसस्थानकाची आणि प्रवाशांसाठी आवश्यक निवारा शेडची उभारणी करण्यात आली आहे. तसेच महिला कक्ष, पोलीस चौकी, परिवहन महामंडळासाठी कार्यालय आदी उपलब्ध करण्यात आले आहे. मात्र सध्या बसस्थानकाच्या देखरेखीकडे दुर्लक्ष झाले असून बसस्थानकाची दुरवस्था झाली आहे. सदर बसस्थानक निराश्रीतांचे आश्रयस्थान बनले आहे. तसेच स्वच्छता केली जात नसल्याने दुर्गंधी पसरली आहे. बसस्थानकाचा विकास करताना सुशोभिकरण करून विविध ठिकाणी कठडय़ांची उभारणी करण्यात आली होती. मात्र या ठिकाणी येणाऱया बसच्या ठोकरीमुळे कठडय़ांची नासधूस झाली आहे.
दहा प्लॅटफॉर्म असूनही बसेस उभ्या केल्या जातात अस्ताव्यस्त
त्याचप्रमाणे या ठिकाणी प्रवाशांसाठी आवश्यक असलेल्या सुविधा उपलब्ध करण्याकडे परिवहन महामंडळाचे दुर्लक्ष झाले आहे. बसस्थानकात 10 प्लॅटफॉर्म निर्माण करण्यात आले आहेत. त्यामुळे एकाचवेळी 10 बस या ठिकाणी थांबू शकतात. पण नियंत्रणाअभावी बस व्यवस्थित थांबविल्या जात नाहीत. तसेच मध्यवर्ती बसस्थानकावरून निघणाऱया बस कारवार बसस्थानकात येत नाहीत. काही बस गोगटे चौकातून परस्पर जात आहेत. सावंतवाडी, कुडाळ, वेंगुर्ला, तसेच दोडामार्ग आणि पणजी-गोवा अशा विविध भागातील बस कारवार बसस्थानकात येत असत. पण अलीकडे या बसेस परस्पर जात असल्याची टीका नागरिक करीत आहेत.
कोकण भागातील काही बस पहाटे 5.00 वा. मध्यवर्ती बसस्थानकावरून निघून 5.30 वा. कारवार बसस्थानकात येत असत. पण या बसदेखील येत नसल्याची तक्रार प्रवासी करीत आहेत. सध्या दक्षिण भागात धावणाऱया बस आणि पणजी-वास्को आणि इतर शहरांना जाणाऱया बस थेट मध्यवर्ती बसस्थानकातून निघत आहेत. त्यामुळे सदर बसस्थानकापर्यंत या बस पोहोचत नाहीत. परिणामी प्रवाशांची गैरसोय होत आहे.
मोजक्याच बस येत असल्याने प्रवाशांची गैरसोय
पाच कोटीचा निधी खर्च करून बसस्थानकाची उभारणी करण्यात आली. पण काही मोजक्मयाच बस याठिकाणी येत आहेत. वास्तविक पाहता प्रवाशांच्या सुविधेसाठी बस नियंत्रण कक्ष स्थापन करून अधिकाऱयांची नियुक्ती करणे गरजेचे आहे. पण याकडे कानाडोळा करण्यात आला आहे. तसेच प्लॅटफॉर्मवर गावांचे नामफलक लावण्यात आले नाहीत. त्यामुळे प्रवाशांची गैरसोय होत आहे. बस किती वाजता येणार आणि कोणत्या ठिकाणी जाणार याची माहिती प्रवाशांना मिळत नाही. परिसरातील व्यावसायिकांना विचारणा करण्याची वेळ प्रवाशांवर येत आहे. नियंत्रण कक्ष सुरू करण्याच्यादृष्टीने आवश्यक कारवाई करणे गरजेचे आहे.
बसस्थानकात मद्यपानाचे प्रकार घडत असल्याची प्रवाशांची तक्रार
बसस्थानकाच्या देखभालीकडे दुर्लक्ष झाल्याने बसस्थानकावर बेघर नागरिकांचे वास्तव्य वाढले आहे. त्याचप्रमाणे मद्यपान, धूम्रपान अशा प्रकारासह अनैतिक प्रकार घडत असल्याची तक्रार नागरिक करीत आहेत. त्यामुळे या बसस्थानकाच्या देखभालीसाठी आवश्यक उपाययोजना राबविण्यात याव्यात, अशी मागणी होत आहे.