लोकसभा निवडणूक अजून खूप खूप दूर असल्या तरी राजकीय पक्षांनी मात्र आताच सराव सुरू केला आहे. महाराष्ट्रात भाजपच्या केंद्रीय मंत्र्यांनी जिथे भाजप सोडून इतर पक्षाचे खासदार निवडून आले तिथल्या तयारीची पाहणी करून बैठक घेतली. बारामतीची जबाबदारी खुद्द अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी घेतली आहे. देशभर अशाच पद्धतीने तयारी सुरू आहे. उत्तर भारतातील सर्वात सजग प्रदेश म्हणजे बिहार! तिथे नितीश कुमार यांनी पुन्हा एकदा पलटी मारत भाजपला धोबीपछाड दिली आहे. ही त्यांची लोकसभेची तयारी आहे. भाजप आणि प्रादेशिक पक्षांची लढाई सातत्याने कोठे ना कोठे सुरू असते. तेथे केंद्रीय तपास यंत्रणांचा जोरदार वावर सुरू होतो. त्या तपासाला दार बंद करण्याची रणनीती बिगर भाजपाई पक्षांनी आखली आहे. बंगाल, महाराष्ट्र, बिहार येथे भाजपने केलेल्या प्रयत्नांपैकी महाराष्ट्रातील यशस्वी झाला. आता त्यांचे लक्ष झारखंड आणि दिल्लीकडे आहे. तिथल्या परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन आधीच जागे झालेल्या मेघालयाचे मुख्यमंत्री संगमा यांनी भाजपला सोबत न घेता स्वबळावर राज्याची निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. ज्याची फारशी चर्चा नसली तरी झारखंड आणि दिल्लीत जोराचे ढोल वाजताहेत. देशभर चर्चेत आहेत. मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांना खाणीच्या मालकीवरून अपात्र ठरवल्यानंतर तेथे आधीपासून सुरू असणारे सत्तांतराचे प्रयत्न अधिक गतिमान होतील हे लक्षात घेऊन आपले आणि काँग्रेसचे सदस्य घेऊन सोरेन बाहेर पडलेत. त्यातच एका मुस्लिम युवकाने हिंदू मुलीला पेटवून दिल्याने तेथे लव्ह जिहादचा मुद्दा पेटण्याची चिन्हे आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रेवडी संस्कृती विरोधात वक्तव्य करून आम आदमी पक्षाच्या कार्यपद्धतीलाच आव्हान दिले होते. ते केजरीवाल यांना इतके गांभीर्याने का घेत आहेत असा प्रश्न पडला असतानाच केजरीवाल यांनी भाजपवर गुजरातमध्ये जाऊन आरोप केले. गुजरातच्या शहरी भागामध्ये आपला मिळणाऱया प्रतिसादाला भाजपने गांभीर्याने घेतल्याचे त्यामुळे लक्षात आले. ग्रामीण भागात काँग्रेसचे आव्हान आहे. शहरी भागाच्या जोरावर गत निवडणुकीत भाजपने सत्ता टिकवली. तेथे जर आपने घुसखोरी केली तर लोकसभेपूर्वीच आपल्या विरोधात वातावरण तयार व्हायला सुरुवात होईल हे लक्षात घेऊन भाजप हल्ले करणार असे दिसत होते. आपने या संकटात संधी शोधली. मद्य धोरणाविरोधात मनीष सिसोदियांवर कारवाई ही त्यांना फोडण्यासाठी होती. सिसोदिया यांना पक्ष फोडण्याचे, त्या बदल्यात दिल्लीचे मुख्यमंत्री करण्याचे व चौकशी थांबवण्याचे आमिष भाजपकडून दाखवले गेले असा आरोप करण्यात आला. शिवाय देशभरात जिथे जिथे पक्षाची सरकारे पाडली तिथे आमदार खरेदीला साडेपाच हजार कोटीची रक्कम भाजपने खर्च केली. त्याची वसुली करण्यासाठी जीएसटी वाढवण्यात आली. आता प्रत्येक वषी भारतातील जनतेला साडेसात हजार कोटी रुपये यासाठी जादा मोजावे लागतील असा दावा केजरीवाल यांनी केला आहे. केजरीवाल यांचा आवेश पाहिल्यानंतर 2012ला लोकसभा निवडणुकीच्या दोन वर्षे आधी अण्णा आंदोलनातील त्यांच्या पत्रकार परिषदांची आठवण येते. मनमोहन सिंग यांच्या सरकार विरोधात ते असेच त्वेशाने बोलायचे. आम आदमी पक्ष दिल्लीत इतका जोरदार वाढेल आणि पुढच्या काळात त्याला आणि त्याच्या धोरणांना आव्हान देणे मुश्कीलीचे बनेल असे भाजपला त्यावेळी वाटले नसेल. पण आज जेव्हा दिल्लीपेक्षा मोठे पंजाब राज्य त्यांनी जिंकले आणि तिथले सगळे विरोधक अत्यल्प संख्येने विजयी झाले, त्यामुळे आता हा पक्ष केवळ काँग्रेसची मते खाणारा राहिलेला नाही हे वास्तव चाणाक्ष मोदी यांनी जाणले. त्यांनी रेवडी संस्कृतीवर जोराची टीका केली. अर्थात ही संस्कृती भाजपपासून कोणत्याही पक्षाने अस्पृश्य मानलेली नाही. मोदी ज्या राज्यात निवडणुकीला सामोरे जातात तिथल्या काही प्रमुख वस्तूवरील जीएसटी केंद्र सरकार घटवते, /ही रेवडीच आहे. मात्र तरीही विरोध करायचा तर त्यांच्या मॉडेललाच आव्हान देणे गरजेचे आहे हे लक्षात घेऊन टीका होते. आता दिल्ली विधानसभेत आपल्यावरील विश्वास ठराव पुन्हा एकदा मंजूर करून घेऊन भाजपला शक्ती दाखवण्याची तयारी केजरीवाल करत आहेत. मोदी यांना हिमाचल प्रदेश, गुजरात, कर्नाटक असे अनेक राज्यात निवडणुकांना सामोरे जायचे आहे. त्यांच्या पक्षाकडे नेत्यांची फौज असली आणि त्या-त्या राज्यातील नेत्यांवर सुटून पडायला दिवसाला तिघे-चौघे पत्रकार परिषदा घेतील इतके मोठे नेते पावलोपावली असले तरी मोदी यांच्याशिवाय भाजपची डाळ शिजत नाही. आता कर्नाटकात प्रत्येक महिन्याला मोदी भेट देतील असे माजी मुख्यमंत्री येडियुराप्पा यांनी जाहीर केले आहे. नुकताच मोदींनी गुजरातचा दौरा पूर्ण केला. भाजपसाठी डोकेदुखीची बाब म्हणजे त्यांच्या मंत्र्यांवर या दोन्ही राज्यात भ्रष्टाचाराचे आरोप होत आहेत. कर्नाटकच्या शिक्षण मंत्र्याविरोधात तर शिक्षण संस्थांनी 40 टक्के कमिशनच्या आरोपांची राळ उडवली आहे. गुजरातमध्ये नुकतेच अख्खे मंत्रिमंडळ बदलले तरी एका मंत्र्यावर भ्रष्टाचाराचा आरोप करून त्याला घरी घालवण्याची मागणी जोर धरत आहे. या आव्हानाला पार करत मोदी कधी गुलाम नबी आझाद यांचे कौतुक करून काँग्रेसमध्ये खळबळ उडवून देतात तर कधी महाराष्ट्राला एकोणीस हजार कोटी रुपये केंद्राकडून मदत देण्याचे आश्वासन देऊन ठाकरेंना चुचकारतात. त्यामुळे त्यांच्याकडूनही कठोर टीका होते. गुजरातमधील मोदी यांच्या खादी वरील वक्तव्याचा समाचार घेत राहुल गांधी यांनी खादीचे गुणगान गायचे आणि राष्ट्रध्वजासाठी चीनमधून पॉलिस्टर कापड आणायचे. मोदींच्या कथनी-करणीत भेद असतो अशी टीका राहुल गांधी यांनी केली तर बिलकीस बानो मुस्लिम असली तरी तिच्यावर बलात्कार करून तिच्या मुलीची क्रूर हत्या करणारे आरोपी जेलमुक्त करणे कुठल्या हिंदुत्वात बसते? असा प्रश्न ठाकरेंनी सामनातून केला आहे. एकूणच टीकेचा सूर वाढत चालला आहे. लोकसभेची रंगीत तालीम सुरू झाल्याची ही चिन्हे.
Previous Articleदिवाळीत जिओचा 5-जी धमाका
Next Article खेडमध्ये भंगार गोदामातील स्फोटात कामगाराचा मृत्यू
Tarun Bharat Portal
Parasharam Patil is a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in editorial news, local news entertainment, and political content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.