राहुल गांधी यांचा पुन्हा विदेशातून हल्लाबोल
वृत्तसंस्था/ लंडन
सात दिवसांच्या ब्रिटन दौऱयावर असलेल्या काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा खुल्या व्यासपीठावरून मोदी सरकारवर टीका केली आहे. लंडनमधील इंडियन जर्नालिस्ट असोसिएशनने इंडिया इनसाईट्स अंतर्गत राहुल गांधी यांच्याशी चर्चा केली. यादरम्यान त्यांना देशाचा अपमान मी नाही तर खुद्द पंतप्रधान मोदी यांच्याकडूनच होत असल्याचा हल्लाबोल त्यांनी चढवला.
पंतप्रधान मोदी किंवा त्यांच्या सरकारबाबत ज्यांच्याकडून प्रश्न उपस्थित केले जातात त्यांना कोणत्या ना कोणत्या प्रकरणात गुंतवले जाते, असे राहुल गांधी यांनी म्हटले आहे. बीबीसीच्या बाबतीतही तेच झाले असा दावा त्यांनी आपल्या भाषणात केला. तसेच लोकसभा निवडणुकीची उमेदवारी आणि भारत-चीन संबंधांवरही त्यांनी परखडपणे भाष्य केले.
गेल्यावेळी पंतप्रधानांनी परदेशात जाऊन स्वातंत्र्याच्या 70 वर्षांत काहीही झाले नाही, अशी घोषणा केली होती. तसेच भारतात प्रचंड भ्रष्टाचार असल्याचेही त्यांनी परदेशात सांगितले होते. मी कधीही माझ्या देशाचा अपमान केला नाही. मी असे कधीच करणार नाही. 70 वर्षात काहीही झाले नाही असे जेव्हा ते म्हणतात, तेव्हा हा प्रत्येक भारतीयाचा अपमान नाही का? असा प्रश्न राहुल गांधी यांनी उपस्थित केला.
सरकारला प्रश्न विचारणाऱयावर हल्लाबोल
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा कोणी समर्थक असेल तर त्याला आंधळेपणाने पाठिंबा दिला जातो. उलट त्यांच्यावर किंवा केंद्र सरकारवर प्रश्नचिन्ह निर्माण करणाऱयांवर हल्ले केले जातात. असाच काहीसा प्रकार ब्रिटिश ब्रॉडकास्टिंग कॉर्पोरेशनच्या (बीबीसी) बाबतीत घडला आहे. बीबीसीने गुजरात दंगलीवर डॉक्मयुमेंट्री बनवली आणि मोदी सरकारने वाद निर्माण केला. सदर डॉक्युमेंट्रीला अपप्रचार संबोधून त्याच्यावर बंदीही घातली, असे राहुल गांधी म्हणाले.