यशस्वी जैस्वाल सामनावीर, मध्यप्रदेशचा 238 धावांनी पराभव
वृत्तसंस्था/ ग्वाल्हेर
रविवारी येथे झालेल्या पाच दिवसांच्या इराणी करंडक क्रिकेट सामन्यात ‘सामनावीर’ यशस्वी जैस्वालच्या शानदार फलंदाजीच्या जोरावर शेष भारत संघाने खेळाच्या शेवटच्या दिवशी मध्यप्रदेशचा 238 धावांनी दणदणीत पराभव करून इराणी करंडक पुन्हा स्वत:कडे राखला. या स्पर्धेच्या इतिहासात आतापर्यंत शेष भारत संघाने 30 वेळा इराणी करंडकावर आपले नाव कोरले आहे.
या सामन्यात शेष भारत संघाने पहिल्या डावात 484 धावांचा डोंगर उभा केल्यानंतर मध्यप्रदेशने पहिल्या डावात 294 धावा केल्या. शेष भारत संघाने 190 धावांची भक्कम आघाडी घेतली. त्यानंतर शेष भारत संघाचा दुसरा डाव 246 धावांत आटोपला. मध्यप्रदेश संघाला निर्णायक विजयासाठी 437 धावांचे कठीण आव्हान मिळाले. मध्यप्रदेश संघाने 2 बाद 81 या धावसंख्येवरून शेवटच्या दिवशीच्या खेळाला प्रारंभ केला. मध्यप्रदेशच्या दुसऱ्या डावाला चांगली सुरुवात झाली नाही. शेष भारताच्या मुकेशकुमारच्या गोलंदाजीवर मध्यप्रदेशचा सलामीचा फलंदाज अकील खाते उघडण्यापूर्वीच पायचित झाला. त्यानंतर कर्णधार मंत्री आणि शुभम शर्मा यांनी दुसऱ्या गड्यासाठी 51 धावांची भागीदारी केली. सौरभकुमारने शुभम शर्माला 13 धावावर त्रिफळाचित केले. कर्णधार हिमांशू मंत्रीने अर्धशतक झळकविले. त्याने 81 चेंडूत 51 धावा जमवल्या. नवदीप सैनीने मंत्रीला बाद केले. मध्यप्रदेशची स्थिती यावेळी 3 बाद 81 अशी होती.
हर्ष गवळी आणि अमन सोळंकी या जोडीने चौथ्या गड्यासाठी 49 धावांची भर घातली. गवळी आणि सोळंकी यांच्या चिवट खेळीमुळे मध्यप्रदेशला 140 धावांचा टप्पा ओलांडता आला. शेष भारत संघातील सेठने गवळीला 48 तर नारंगने सोळंकीला 31 धावावर बाद केले. मध्यप्रदेशने यावेळी 6 बाद 151 धावापर्यंत मजल मारली होती. मध्यप्रदेशच्या तळाच्या फलंदाजांकडून विशेष प्रतिकार होऊ शकला नाही. 2021-22 च्या क्रिकेट हंगामात रणजी चषक मिळवणाऱ्या मध्यपदेशचा दुसरा डाव 58.4 षटकात 198 धावांत आटोपला. शेष भारत संघातर्फे सौरभकुमारने 60 धावात 3, नारंगने 27 धावात 2, मुकेशकुमारने 34 धावात 2, सेठने 37 धावात 2 आणि सैनीने 34 धावात एक गडी बाद केला. रविवारी खेळाच्या शेवटच्या दिवशी उपाहारावेळीच सामना समाप्त झाला.
या संपुर्ण सामन्यामध्ये शेष भारत संघातील फलंदाज यशस्वी जैस्वालने दोन्ही डावात दमदार फलंदाजी केली. पहिल्या डावात त्याने 259 चेंडूत 3 षटकार आणि 30 चौकारासह 213 धावा तर दुसऱ्या डावात त्याने शतक झळकविले. जैस्वालने दुसऱ्या डावात 157 चेंडूत 3 षटकार आणि 16 चौकारासह 144 धावा झळकविल्या होत्या. या सामन्यामध्ये एकूण 4 शतके झळकविली गेली तर वेगवान आणि फिरकी गोलंदाजांनी 40 बळी मिळविल्याने ग्वाल्हेरची ही खेळपट्टी फलंदाजीप्रमाणेच गोलंदाजीलाही अनुकूल असल्याचे दिसून आले. संक्षिप्त धावफलक : शेष भारत प. डाव 121.3 षटकात सर्वबाद 484, मध्यप्रदेश प. डाव 112.5 षटकात सर्वबाद 294, शेष भारत दु. डाव 71.3 षटकात सर्वबाद 246, मध्यप्रदेश दु. डाव 58.4 षटकात सर्वबाद 198 (मंत्री 51, गवळी 40, सोळंकी 31, शुभम शर्मा 13, सौरभकुमार 3-60, मुकेशकुमार 2-34, सेठ 2-37, नारंग 2-27, सैनी 1-34).