पाचगाव, वार्ताहर
Morewadi kolhapur news : प्राधिकरणाने पाणी वाटपाचे योग्य नियोजन करून त्याची अंमलबजावणी करावी व मोरेवाडी परिसरातील नागरिकांना मुबलक पाणीपुरवठा करावा अशा सूचना आमदार ऋतुराज पाटील यांनी प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांना मोरेवाडी येथे झालेल्या बैठकीत दिल्या. मोरेवाडी तालुका करवीर येथे विस्कळीत झालेल्या पाणीपुरवठाबाबत ऋतुराज पाटील,महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे अधिकारी, ग्रामपंचायतीचे पदाधिकारी व ग्रामस्थांची शुक्रवारी बैठक पार पडली.
यावेळी ग्रामपंचायत पदाधिकारी आणि ग्रामस्थांनी प्राधिकरणच्या अधिकाऱ्यांवर प्रश्नांचा भडीमार केला. मोरेवाडी परिसरात अनेक ठिकाणी पाणी गळती सुरू आहे.ही गळती तात्काळ काढण्यात यावी.नागरिकांना नियमित व मुबलक पाणीपुरवठा करण्यात यावा अशी मागणी नागरिकांनी केली.नागरीकांची मागणी लक्षात घेऊन ऋतुराज पाटील यांनी प्राधिकरणच्या अधिकाऱ्यांना सूचना केल्या.कार्यकारी अभियंता पाथरवट यांनी आठ दिवसात पाणी पाईपलाईनची गळती काढून नियमित पाणीपुरवठा करू असे आश्वासन दिले.
या बैठकीचे प्रास्ताविक सुनील शिंदे यांनी केले. सरपंच ए. व्ही. कांबळे यांनी बैठकीतील विविध मुद्द्यांबाबत सविस्तर माहिती सांगितली. शिवसेना तालुकाप्रमुख विराज पाटील, ग्रामपंचायत सदस्य आशिष पाटील, शिल्पा सुतार, व ग्रामस्थांनी नागरिकांच्या पाणीपुरवठा बाबतच्या समस्या मांडल्या. या बैठकीसाठी उपसरपंच दत्तात्रेय भिलुगडे,अमर मोरे, आशिष पाटील,संभाजी मोरे,ऋषिकेश हुन्नुरे,ग्रामसेवक दत्तात्रेय धनगर,मारुती सूर्यवंशी,सिद्धी कारंडे,सुदर्शन पाटील यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.