कौन्सिल विभागाला महापौरांच्या पत्राची प्रतीक्षा
बेळगाव : विधानसभा निवडणुकीची घोषणा झाल्यास आचारसंहितेच्या कचाट्यात मनपाचा अर्थसंकल्प सापडण्याची शक्मयता आहे. त्यामुळे स्थायी समिती निवडणुका घेण्यापूर्वीच बैठक घेऊन मनपाचा अर्थसंकल्प मंजूर करण्यासाठी महापौरांनी प्रयत्न चालविला असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. काही मोजक्मयाच नगरसेवकांच्या बैठकीत याबाबत चर्चा करून सोमवार दि. 6 रोजी अर्थसंकल्प बैठक घेण्यासाठी हालचाल सुरू आहेत. महापौर-उपमहापौर निवडणूक होऊन महिना होत आला. पण अद्याप स्थायी समिती निवडणुका घेण्यात आल्या नाहीत. त्यामुळे महसूल स्थायी समितीकडून अर्थसंकल्पावर चर्चा होणे अशक्य आहे. याला पर्याय म्हणून काही नगरसेवकांची मते जाणून घेऊन अर्थसंकल्प बैठक घेण्यासाठी महापौरांनी विचार चालविला असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. विधानसभा निवडणूक जाहीर झाल्यास आचारसंहिता लागू होणार आहे. त्यामुळे महापालिकेचा अर्थसंकल्प मंजुरीला विलंब होण्याची शक्यता आहे.
आगामी काळात निर्माण होणाऱ्या समस्येची माहिती घेऊन स्थायी समिती निवडणुका प्रलंबित ठेवून थेट अर्थसंकल्प बैठक घेण्यात येणार आहे. शुक्रवारी महापौर कक्षात 22 नगरसेवकांच्या उपस्थितीत अर्थसंकल्प बैठक घेण्याबाबत चर्चा करण्यात आली. 35 पैकी मोजक्याच नगरसेवकांच्या उपस्थितीत बैठक घेऊन अर्थसंकल्प बैठकीची तारीख निश्चित करण्याची चर्चा करण्यात आली. यावेळी लेखा विभागाचे लेखाधिकारी बजंत्री यांच्याकडून अर्थसंकल्पाच्या तयारीची माहिती महापौर शोभा सोमनाचे व उपमहापौर रेशमा पाटील यांनी जाणून घेतली. तसेच सोमवार दि. 6 रोजी अर्थसंकल्प बैठक घेण्याबाबत विचारविनिमय करण्यात आला. मात्र शुक्रवारी सायंकाळपर्यंत अर्थसंकल्पाच्या बैठकीच्या तारखेबाबत शिक्कामोर्तब झाले नाही. पण 6 रोजी अर्थसंकल्प बैठक घेण्याची सूचना कौन्सिल विभागाला करण्यात आली आहे. महापौरांनी याबाबत कौन्सिल विभागाला लेटरहेडवर पत्र देणे आवश्यक आहे. कौन्सिल विभागाने सर्व तयारी सुरू केली आहे. पण महापौरांच्या पत्राची प्रतीक्षा आहे. महापौरांनी पत्र दिल्यानंतरच नगरसेवकांना बैठकीची नोटीस बजावली जाणार आहे. महापालिकेकडे केवळ दोन दिवसांचा अवधी शिल्लक आहे. त्यामुळे दि. 6 रोजी अर्थसंकल्प बैठक होणार का? याबाबत साशंकता आहे.