काही भागात 10 ते 15 दिवस पाणीच नाही : मनपा-एलअॅण्डटी कार्यालयावर मोर्चा काढण्याची तयारी
बेळगाव : शहर आणि उपनगरांतील पाणी समस्येचा तिढा अद्याप सुटला नाही. वडगाव आणि चव्हाट गल्ली परिसरात गेल्या 15 दिवसांपासून पाणीपुरवठा करण्यात आला नसल्याने भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे. विविध भागात पाणीटंचाईमुळे नागरिक हैराण झाले असून महापालिका आणि एलअॅण्डटी कार्यालयावर मोर्चा काढण्याची तयारी सुरू आहे. पाणीपुरवठा नियोजन पूर्णपणे कोलमडले असून 10 ते 15 दिवस पाणीपुरवठा होत नसल्याने शहरवासियांतून संताप व्यक्त करण्यात येत आहे. पाणीपुरवठ्यासंदर्भात एलअॅण्डटी कंपनीकडे सातत्याने तक्रार करूनही कोणतीच दखल घेतली जात नाही. तीन ते सहा महिन्यांत बदलणाऱ्या एलअॅण्डटी कंपनीच्या अधिकारी व अभियंत्यांना शहरवासियांच्या पाणी समस्येबाबत कोणतेच सोयरसुतक नसल्याचे निदर्शनास आले आहे. दररोज कोणत्या ना कोणत्या भागातील तक्रारी होत आहेत. गेल्या महिन्याभरापासून शहरातील पाणीपुरवठ्याचे नियोजन बिघडले असून काही भागात 10 ते 15 दिवस पाणी नसल्याने पाण्यासाठी भटकंती करण्याची वेळ आली आहे.
वडगाव परिसरात गेल्या 15 दिवसांपासून पाणीपुरवठा करण्यात आला नाही. परिसरातील रहिवाशांच्या विहिरी आणि कूपनलिका दूषित झाल्या आहेत. त्यामुळे पाणी टँकरने विकत घेण्याची वेळ आली आहे. पाणीटंचाई निर्माण झाली आहे की एलअॅण्डटीकडून कृत्रिमरित्या पाणीटंचाई निर्माण केली जात आहे? असा मुद्दा उपस्थित करण्यात येत आहे. गेल्या काही दिवसांपासून सुरळीत पाणीपुरवठा होत नसल्याने नागरिक हैराण झाले आहेत. टँकरसाठी 600 ते 800 ऊपये मोजावे लागत आहेत. त्यामुळे एलअॅण्डटीच्या कारभाराबद्दल नाराजी व्यक्त केली जात आहे. चव्हाट गल्लीतदेखील गेल्या 8 दिवसांपासून पाणी नसल्याने नागरिकांची गैरसोय झाली आहे. पाणीपुरवठा सुरळीत न केल्यास महापालिका आणि एलअॅण्डटी कंपनीच्या कार्यालयावर मोर्चा काढण्याची तयारी काही संघटनांनी चालविली आहे.