केएसआरपीसी प्रशिक्षण केंद्रासमोरच शेतकऱयांनी सुरू ठेवले आंदोलन
बेळगाव : ऊस दरासाठी शेतकऱयांनी गेल्या काही दिवसांपासून आंदोलन छेडले आहे. सरकारने केवळ आश्वासने दिली. त्यामुळे शुक्रवारी सुवर्णसौधसमोर धरणे आंदोलन छेडण्यात येणार होते. तत्पूर्वी शेतकरी संघटनेच्या नेत्यांना घरीच जाऊन अटक केली तर सुवर्णसौधकडे येणाऱया शेतकऱयांनाही ताब्यात घेऊन पोलीस स्थानकात स्थानबद्ध केले. यामुळे शेतकऱयांनी केएसआरपी मैदानाच्या परिसरात आंदोलन छेडले आहे. रात्री उशिरापर्यंत शेतकरी तेथे ठाण मांडून होते.
शेतकऱयांनी उसाला प्रतिटन 5 हजार 500 रुपये दर जाहीर करावा, अशी मागणी केली आहे. यापूर्वी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शेतकऱयांनी धरणे आंदोलन छेडले होते. दोन दिवस त्या ठिकाणी अहोरात्र आंदोलन केले होते. त्यावेळी शेतकऱयांना आश्वासन देण्यात आले होते. शेतकऱयांनी त्यासाठी आठ दिवसांचा अवधी दिला होता. मात्र सरकारने योग्य दर जाहीर केला नाही. त्यामुळे शुक्रवारी सुवर्णसौधसमोर आंदोलन छेडण्याचे जाहीर केले होते.
काही शेतकरी नेत्यांना सकाळीच अटक केली होती. त्यानंतर सुवर्णसौधसमोर जमलेल्या शेतकऱयांनादेखील अटक करून एपीएमसी येथील केएसआरपीच्या प्रशिक्षण केंद्रात नेण्यात आले होते. त्यामुळे शेतकऱयांनी त्याच ठिकाणी आंदोलन छेडले. पोलिसांनी शेतकऱयांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. मात्र शेतकऱयांनी त्यांचे ऐकलेच नाही. साखर आयुक्तांची भेट घडवून आणतो, असे आश्वासन देण्यात आले होते. मात्र रात्री उशिरापर्यंत शेतकऱयांनी आपले आंदोलन सुरूच ठेवले होते.
शेतकरी संघटनेचे नेते चुन्नाप्पा पुजेरी, रवी सिद्धम्मण्णावर, प्रकाश नाईक, राघवेंद्र नाईक, यमकनमर्डी, शिवानंद उळागड्डी, राजू मरवे यांच्यासह इतर शेतकरी मोठय़ा संख्येने उपस्थित होते.