दिवाळीच्या पार्श्वभूमीवर वाहतूक कोंडी : पोलिसांचे दुर्लक्ष, रहदारी नियंत्रणाची मागणी
प्रतिनिधी / बेळगाव
दिवाळी पर्वाला शुक्रवारपासून सुरुवात झाली आहे. त्यामुळे खरेदीसाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. खरेदीला उधाण आले असले तरी कोंडीमुळे मात्र नागरिक बेहाल झाले. अशातच पावसाचा शिडकावा होत नसल्याने खरेदीदार अक्षरशः वैतागले होते. शुक्रवारी मंगलदीपजवळ मोठय़ा प्रमाणात वाहतुकीची कोंडी निर्माण झाली होती. ही बाब नित्याचीच असल्याने नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागला आहे. परिणामी या ठिकाणी वाहतूक पोलिसांची नियुक्ती करावी, अशी मागणी होत आहे.
बाजारपेठेतील वाहतूक कोंडी नित्याचीच बाब असते. तरीही निदान सण-उत्सावात तरी रहदारी पोलिसांनी दक्षता घेणे आवश्यक आहे.
मात्र तसे होताना दिसत नाही. बेशिस्त वाहनधारक, रस्त्यावरच पार्क केलेली वाहने, रस्त्यावर पडलेले विकासकामाचे साहित्य, रस्त्यावरच ठाण मांडून असलेले फेरीवाले आणि वाहनांची वाढती संख्या यामुळे शहरातील वाहतुकीचा प्रश्न अधिक जटिल झाला आहे. परिणामी याचा फटका सर्वसामान्य नागरिकांना बसत आहे. बेशिस्तपणे करण्यात आलेल्या पार्किंगमुळे वारंवार वाहतूक कोंडीचा प्रश्न ऐरणीवर येत आहे. रस्त्याच्या दोन्ही बाजूला वाहने पार्किंग करत असल्याने समस्या गंभीर बनत चालली आहे. त्यामुळे याकडे आता गांभीर्याने लक्ष देण्याची मागणी होत आहे.
शुक्रवारी बाजारपेठ तसेच अरुंद गल्ल्यांमधून बाहेर पडताना वाहनधारकांची दमछाक होत होती. शहरात सर्वत्र वाहनांची संख्या वाढत असल्याने वाहतूक कोंडीचा प्रश्न अधिक चिंताजनक बनला होता. दिवाळीनिमित्त बाजारात खरेदीसाठी नागरिकांची संख्या वाढत आहे. त्यामुळे वाहनांची ये-जा वाढली आहे. मारुती गल्ली, नरगुंदकर भावे चौक, फोर्ट रोड, किर्लोस्कर रोड, समादेवी गल्ली, आरटीओ सर्कल, काकतीवेस रोड आदी भागात वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागत आहे. ही बाब आता नित्याचीच होऊ लागली आहे. त्यामुळे ही कोंडी सोडविण्यासाठी विशेष प्रयत्न करण्याची गरज व्यक्त करण्यात येत आहे.
खरेदीसाठी येणारे नागरिक रस्त्याच्या दोन्ही बाजूला वाहने पार्किंग करत असल्याने ही समस्या अधिक गंभीर होत आहे. शहरात दिवसेंदिवस वाहनांची संख्या वाढत आहे. त्यामुळे लहान-सहान गल्लीतून चारचाकी वाहने ये-जा करणे कठीण झाले आहे. त्यातच रस्त्यावर बेशिस्तपणे वाहने लावली जात असल्याने वाहतुकीचा प्रश्न निर्माण होत आहे. शिवाय विकासकामांसाठी रस्त्यावरच दगड, माती, विटा टाकल्या जात असल्याने वाहतुकीस अडथळा येत आहे. सण-उत्सव, मोर्चे, मंत्र्यांचे दौरे अशावेळी वाहतूक कोंडीचा प्रश्न अधिक तीव्र होत आहे. दरम्यान, पर्यायी मार्गावर वाहनांची संख्या दुपटीने वाढत आहे. दिवसेंदिवस शहरातील वाहतूक व्यवस्थेचा प्रश्न चिंताजनक बनत आहे. त्यामुळे याकडे आता लक्ष देऊन वाहतुकीला शिस्त लावावी, अशी मागणी होत आहे.