जिह्यात तब्बल 76 टक्के खातेदार अल्पभूधारक; राज्यात सर्वत्र अल्पभूधारकांची संख्या सर्वाधिक
कोल्हापूर प्रतिनिधी
राज्याच्या ग्रामीण भागातील दूध उत्पादनास चालना देण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या कृषी व पशुसंवर्धन विभागामार्फत दुधाळ जनावरांची योजना सुरु केली आहे. या योजनेचे निकष निश्चित करताना अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांना वगळले आहे. पण कोल्हापूर जिह्याचा विचार करता एकूण खातेदारांपैकी 76 टक्के खातेदार हे अत्यल्पभूधारक आहेत. राज्यातही सर्वाधिक संख्या अल्पभूधारक शेतकऱ्यांची आहे. त्यामुळे या योजनेमध्ये अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांचा समावेश करावा अशी मागणी आमदार सतेज पाटील यांनी पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय विकासमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांच्याकडे पत्राद्वारे केली.
पत्रात म्हटले आहे, सर्वसाधारण, अनुसूचित जाती उपयोजना व जिल्हास्तरीय नावीन्यपूर्ण आदिवासी क्षेत्र उपयोजनांतर्गत लाभार्थींना 2 दुधाळ जनावरांचा गट दिला जाणार आहे. सदर योजनेच्या लाभार्थी निवडीसाठी तीन निकष आहेत. यामध्ये महिला बचत गटातील लाभार्थी, अल्पभूधारक शेतकरी (1 ते 2 हेक्टर पर्यंतचे भूधारक) तसेच सुशिक्षित बेरोजगार ज्यांची नोंद शासनाच्या विभागाकडे करण्यात आली आहे. मात्र लाभार्थी निवडीच्या निकषातून अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांना वगळले आहे. कोल्हापूर जिह्याचा विचार करता एकूण खातेदारांपौकी तब्बल 76 टक्के म्हणजेच 5 लाख 4 हजार 117 खातेदार हे अत्यल्प भूधारक असून संपूर्ण महाराष्ट्र राज्यातील किमान 1 कोटी अत्यल्प भूधारक शेतकरी या योजनेपासून वंचित राहणार आहेत. त्यामुळे या योजनेच्या लाभार्थी निवडीच्या निकषामध्ये बदल करून अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांचा देखील समावेश होणे आवश्यक आहे.
त्यामुळे शासनाच्या कृषी व पशुसंवर्धन विभागामार्फत संदर्भीय शासन निर्णयानूसार सुरु करण्यात येणाऱ्या दुधाळ जनावरांच्या योजनेमध्ये अत्यल्पभूधारक शेतकऱ्यांचाही समावेश होण्यासाठी लाभार्थी निवडीच्या निकषामध्ये आवश्यक तो बदल करण्यासाठी शासन स्तरावर उचित कार्यवाही करुन सहकार्य करावे, अशी पत्राद्वारे मागणी केली आहे.