जिल्हाधिकारी कोल्हापूर यांना शिष्टमंडळाने दिले निवेदन
उचगाव / प्रतिनिधी
करवीर तालुक्यातील उचगाव ग्रामपंचायतीचा संभ्रम निर्माण करणारा संशयास्पद निकाल आम्हास मान्य नाही. उचगावची संपूर्ण निवडणूक प्रक्रिया पुन्हा राबवावी, जर निवडणूक लागत नसेल तर त्याऐवजी प्रशासकीय नेमणूक व्हावी. उचगाव निकालाच्या वेळी संशय निर्माण करणार्या सर्व घटनाक्रमांची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी सोमवारी उचगावात जनआक्रोश निषेध मोर्चा काढून करण्यात आली.
निवेदनात म्हटले आहे की, उचगांव ग्रामपंचायत निवडणूक काळात उचगांवमधील वोटिंग मशीन्स किंवा मतपेटी घेवून जाण्यासाठी खाजगी शिक्षणसंस्थेच्या शालेय बसेस ठरविल्या व त्या बसेस उचगांव फाटा येथे ३०ते ३५ मिनीटे थांबवल्या, याशिवाय त्या मतपेटीबरोबर प्रशासकिय अधिकरी नव्हते असा आरोप करून या घडामोडी संशयास्पद आहेत असे आंदोलकांनी म्हटले आहे.
निवेदनात जिल्हाधिकारी कार्यालय कोल्हापूर येथे उचगाव जनआक्रोश मोर्चाच्या वतीने शिष्टमंडळाने दिले. पुढील आठ दिवसात आपला निर्णय ग्रामस्थांना कळवावा अन्यथा निवडणूक प्रशासकाविरोधी उग्र आंदोलन करण्याचा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला. हे निवेदन जिल्हाधिकारी कोल्हापूर यांच्या वतीने संजय चौगुले यांनी स्विकारले.
उचगाव ग्रामपंचायत ते उचगाव कमान छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे हजारोच्या संख्येने सोमवारी सकाळी अकरा वाजता निषेध मोर्चा काढण्यात आला. उचगाव ग्रामपंचायत निवडणूक निकाल प्रक्रियेत घोटाळा झाल्याचा दावा करीत अनेक महिला व युवक मोठ्या संख्येने ग्रामपंचायत कार्यालय चौकात पोहचले.यात महिलांची संख्या लक्षणीय होती.विरोधी पक्षाचे कार्यकर्ते व नेते व ग्रामस्थ यांनी या मोर्चाचे आयोजन केले होते.
छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे आरपीआयचे सतिश माळगे, माजी उपसरपंच राजेंद्र चौगुले,अजित पाटील, विजयमाला देशमुख यांनी मनोगतात निवडणूक निकाल प्रक्रियेत घोटाळा झाल्याचा आरोप करीत हा भव्य जनआक्रोश निषेध मोर्चा काढण्यात आला असुन पुन्हा नव्याने निवडणूक घेण्याची मागणी केली.यावेळी निकाल प्रक्रियेत दबाव आणार्यांचा निषेध व्यक्त करीत प्रशासन विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.