ई- ग्रामस्वराज्य प्रणालीमध्ये उल्लेखनीय कामकाज केलेल्या ग्रामपंचायतींचा गौरव
कोल्हापूर : प्रतिनिधी
सन २०२३-२४ चा जीपीडीपी आराखडा करताना १५ वित्त आयोग सोबत इतर शासकीय योजनाचे अभिसरण करून परिपूर्ण आराखडा तयार करण्याबरोबरच ऑनलाईनची कामे विहित वेळेत व गुणवत्तापुर्ण करा अशा सूचना जिल्हा परिषदेचे प्रशासक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण यांनी दिल्या.
जिल्हातील ई-ग्रामस्वराज प्रणालीमध्ये सन २०२२-२३ या आर्थिक वर्षाचे वार्षिक लेखे ३१ मार्च २०२३ रोजी ऑनलाईन क्लोज करून जिल्हात सर्व प्रथम येण्याचा बहुमान मिळवलेल्या ५ ग्रामपंचायतीच्या सरपंच, ग्रामसेवक, केंद्रचालक यांचा प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाला ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी अरूण जाधव उपस्थित होते.
संजयसिंह चव्हाण म्हणाले, गावगाड्याचा कारभार आता ऑनलाईन झाला आहे. यामुळे श्रमाची आणि वेळेची तसेच पैशाचीही बचत होते. त्यामुळे सर्वच ग्रामपंचायतीनी या बिनचूक प्रणालीचा उपयोग केला पाहीजे. ग्रामपंचायत तिरवडे, हेलेवाडी व भाटीवडे ता, भुदरगड, ग्रामपंचायत शेळकेवाडी ता करवीर, ग्रामपंचायत वाघुर्डे ता पन्हाळा या ग्रामपंचायतींच्या सरपंच, ग्रामसेवक, केंद्रचालक यांचा सत्कार करण्यात यावेळी आला . तसेच ग्रामपंचायत चावरे ता हातकणंगले कडील सरपंच, ग्रामसेवक, केंद्रचालक व लिपिक यांचा सन २०२३-२४ चा जीपीडीपी आराखडा सर्व प्रथम ऑनलाईन अपलोड केलेबद्दल त्यांचाही सत्कार करण्यात आला. या वेळी सरपंच शुभांगी जाधव, ग्रामसेविका गीता कोळी यांनी मनोगत व्यक्त करताना उपमुख्य कार्यकारी अधिकारी अरूण जाधव, नितीन मोहिते, यांचे मार्गदर्शन झाल्याचा आवर्जून उल्लेख केला.
वेळ पाळा, दप्तर चोख ठेवा
ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी अरूण जाधव म्हणाले, ग्रामसेवक आणि तलाठी या दोन व्यक्ती म्हणजे गावचे विश्वस्त आहेत. लोकप्रतिनिधींचे मार्गदर्शन घेवून काम करत गावचा विकास साधण्याची जबाबदारी या दोन घटकांवर आहे. त्यामुळे प्रशासनाला आणि नागरिकांना दिलेली वेळ पाळली तसेच आपले दप्तर चोख ठेवले की निश्चीतच गुणवत्तापुर्ण काम होते. त्यामुळे वेळ पाळा आणि दप्तर चोख ठेवा ज्यामुळे तुमची विश्वासहर्ता वाढण्यास मदत होईल.