नवी दिल्ली / वृत्तसंस्था
नॅशनल हेरॉल्ड आर्थिक भ्रष्टाचार प्रकरणी काँगेस नेते राहुल गांधी यांची सोमवारी चौकशी झाल्यानंतर त्यांना पुन्हा आज मंगळवारी चौकशीसाठी ईडीकडून पाचारण करण्यात आले आहे. अनेक प्रश्नांची उत्तरे गांधी यांनी समाधानकारकरित्या न दिल्याने चौकशी लांबली असल्याचे बोलले जाते.
गेल्या आठवडय़ात सोमवार, मंगळवार आणि बुधवार हे सलग तीन दिवस त्यांची चौकशी झाली. साधारणतः 30 तास त्यांच्यावर प्रश्नांचा भडिमार करण्यात आला. नंतर शुक्रवारी त्यांना बोलाविण्यात आले होते. तथापि, त्यांनी वेळ मागून घेतल्याने पुढचे तीन दिवस त्यांची चौकही होऊ शकली नाही. आता सोमवारपासून पुन्हा चौकशीचे सत्र सुरु करण्यात आले असून परिणामासंबंधी औत्सुक्य आहे.
आर्थिक व्यवहारांविषयी प्रश्न
सोमवारी राहुल गांधींना नॅशनल हेरॉल्डचे आर्थिक व्यवहार, एजेएल आणि यंग इंडियन कंपनीचे संबंध, या कंपन्यांच्या नावावर असलेली मालमत्ता आणि या मालमत्तेचा विनियोग कसा करण्यात येत आहे, या कंपन्यांचे स्वरुप नेमके काय आहे, त्या का स्थापन करण्यात आल्या, काँगेसकडून एजेएल कंपनीला दिलेले कर्ज, राहुल गांधी यांची देशातील व विदेशातील मालमत्ता आणि या मालमत्तेचा हिशोब आदी मुद्दय़ांवर प्रश्न त्यांना प्रश्न विचारण्यात येत असून त्यांची उत्तरे टंकलिखित केली जात असून प्रत्येक पानावर त्यांची स्वाक्षरीही घेतली जात आहे.
पुढे काय होणार
राहुल गांधी यांची इतका प्रदीर्घ काळ चौकशी करण्यात येत असल्याने पुढे ईडी नेमके कोणते पाऊल उचलणार याकडे औत्सुक्याने पाहिले जात आहे. राहुल गांधींना अटक होणार का, हा प्रश्न राजकीय वर्तुळात प्रामुख्याने चर्चिला जात असून त्यावर बरेच वादंगही होत आहे. काँगेसने देशात ठिकठिकाणी आंदोलनही या चौकशीच्या विरोधात केले आहे. ईडी नॅशनल हेरॉल्डची मालमत्ता जप्त करणार का, असाही प्रश्न उपस्थित केला जात आहे. एकंदर, या चौकशीमुळे काँगेसच्या अडचणींमध्ये वाढ होण्याची शक्यता तज्ञ व्यक्त करीत आहेत.
चौकशी संपणार केव्हा
राहुल गांधी यांची आतापर्यंत चार दिवस चौकशी झालेली आहे. पुन्हा त्यांना आज मंगळवारी चौकशीसाठी बोलाविण्यात आलेले आहे. त्यामुळे त्यांची चौकशी संपणार केव्हा, असाही प्रश्न उपस्थित केला जात आहे.