ऑनलाईन टीम / तरुण भारत :
गेल्या काही दिवसांपासून पावसाच्या प्रतिक्षेत असलेल्या कोल्हापुरकरांना अखेर दिलासा मिळाला आहे. मध्यरात्रीपासून कोल्हापुरात पावसाने हजेरी लावली आहे. कोल्हापुरसह घाटमाथ्यावर मुसळधार पाऊस सुरू आहे. शहरातही पावसाच्या रिमझिम सरी बरसत आहेत.
यंदा राज्यात सरासरीपेक्षा पावसाचे प्रमाण कमी असल्याने बळीराजा चिंतेत होता. मात्र, कालपासून राज्याच्या काही भागात मान्सून सक्रिय झाला आहे. मध्यरात्री कोल्हापूरातही पावसाने हजेरी लावली. त्यामुळे उकाडय़ाने हैरान झालेल्या कोल्हापुरकरांना काहीसा दिलासा मिळाला. जिल्ह्यातल्या सर्वच भागांत पावसाला सुरुवात झाली आहे. जिल्ह्यातील नागरिकांना मोठय़ा पाणी टंचाईला सामोरे जाण्याची वेळ आली होती. मात्र, आता पावसाला सुरुवात झाल्याने बळीराजा सुखावला आहे.