पावसामुळे कोट्यावधी रुपयांची हानी : सुपारीसह केळी बागायतींचे मोठे नुकसान : घरांवरील पत्रे, भिंती कोसळल्याने नागरिकांना चिंता
कारवार : जोरदार वाऱ्याबरोबर ढगांचा गडगडाट व विजेच्या कडकडाटासह मान्सूनपूर्व पावसाने जिल्ह्यातील कारवार, अंकोला, गोकर्ण, शिरसी आदी भागांना झोपडून काढले. मान्सूनपूर्व पावसामुळे उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना किंचित दिलासा मिळाला आहे, हे खरे असले तरी या पावसामुळे कोट्यावधी रुपयांची हानी झाली आहे. जोरदार वाऱ्यामुळे अनेक ठिकाणी घरांवर व वाहनांवर झाडे कोसळल्याच्या घटना घडल्या. शिरसी तालुक्यात पावसामुळे सुपारी आणि केळी बागांची मोठी हानी झाली आहे. अंकोला तालुक्याच्या ग्रामीण प्रदेशात जोरदार वाऱ्यामुळे हाता-तोंडाला आलेले आंब्याचे पीकही वाया गेले आहे. परिणामी आंबा उत्पादकांना फार मोठा आर्थिक फटका बसला असून त्यांची आर्थिक समीकरणे बिघडण्याची शक्यता वर्तविली जात आहे. पावसामुळे हेस्कॉमची लाखो रुपयांची हानी झाली असून वीजपुरवठ्याचाही खेळखंडोबा झाला. शिरसी तालुक्यातील बिसलकोप्प ग्रा. पं. च्या व्याप्तीतील मुडेबैल येथील लक्ष्मी गणपती गौडा यांच्या घरावरील कौले उडून गेली आहेत. त्याचबरोबर गौडा यांच्या केळी आणि सुपारी बागेचे नुकसान झाले आहे. मुडेबैल येथील शंकर लक्ष्मण नाईक यांच्या घरावरील कौले उडून गेली आहेत. तथापि घरातील सर्वजण सुखरुप आहेत.
गोकर्णवासियांची त्रेधातिरपीट
वाऱ्यासह हजेरी लावलेल्या पावसामुळे गोकर्णवासियांची त्रेधातिरपीट उडाली. तीन ऑटो रिक्षांवर आणि अन्य दोन वाहनांवर झाडे कोसळून वाहनांचा चेंदामेंदा झाला. समुद्र किनाऱ्यावर नांगरण्यात आलेल्या मासेमारी होड्यांचीही नासधूस झाली आहे. विद्युत वाहिन्यांवर झाडे कोसळल्याने विद्युत खांब, ट्रान्स्फॉर्मरची लाखो रुपयांची हानी झाली. दुकान आणि अन्य शेडवरील पत्रे उडून गेल्याच्या घटना घडल्या आहेत. गोकर्ण परिसरात मीठ उत्पादनाचा व्यवसाय चालतो. या व्यवसायालाही पावसाचा फटका बसला आहे. या पावसामुळे नागरिकांचे एकूणच हाल झाले.
अंकोला तालुक्यात 35 लाखांचा फटका
जोरदार वाऱ्यासह कोसळणाऱ्या पावसामुळे अंकोला तालुक्यात 35 लाखांहून अधिक रुपयांची हानी झाली आहे. तालुक्यात एकूण 59 घरांची नासधूस झाली आहे. यापैकी 4 घरे पूर्णपणे कोसळली आहेत तर अन्य 55 घरांची भागश: नासधूस झाली. तालुक्यात अनेक ठिकाणी मोठी झाडे रस्त्यावर आडवी झाली आहेत. हेस्कॉमच्या मालकीच्या सुमारे 120 विद्युत खांबांनी साष्टांग नमस्कार केला आहे. परिणामी हेस्कॉमची सुमारे 30 लाख रुपयांची हानी झाली आहे. वाऱ्यामुळे हाता-तोंडाला आलेले आंब्याचे पीक वाया गेले आहे. वाऱ्यामुळे थोडे आंबे झाडावर तर अधिक आंबे झाडाखाली दिसून येत होते. अंकोलाचे तहसीलदार प्रवीण हुच्चण्णावर आणि त्यांचे कर्मचारी हानीचा आढावा घेत आहेत.