प्रतिनिधी /वास्को
कुठ्ठाळी ते वेर्णापर्यंतच्या नव्या उड्डाण पुलावरून वाहणाऱया पावसाळी पाण्याची योग्य झालेली नसल्याचे दिसत आहे. पुलाखालील रस्त्यावरून वाहणाऱया पाण्याचीही तीच अवस्था असून यंदा हा उड्डाण पुल पूर्ण झालेला असल्याने पावसाळी पाण्याने या पुलाखालील अवस्था अधि बिकट केलेली आहे.
कुठ्ठाळी नाक्यापासून ते केसरव्हाळ वेर्णापर्यंतचा चौपदरी उड्डाण पुल सध्या तयार झालेला आहे. या पुलावर विशेषता कुठ्ठाळी भागात साचणारे पावसाचे पाणी पुलाखालील रस्त्यावर धो धो कोसळू लागले आहे. रस्त्याच्या बाजुला तसेच रस्त्याच्या मधोमधही पुलाखालून पाणी धो धो कोसळत असल्याने या रस्त्यावर आता पाणीच पाणी होऊ लागलेले आहे. कुठ्ठाळीतील या महामार्गावरील घरे खाली आहेत. तर महामार्ग वर असल्याने गेल्या काही वर्षांपासून स्थानिक लोकांना पावसाळी पाण्याचा भयंकर त्रास सहन करावा लागत आहे. हा महामार्ग तयार करणाऱयांनी पावसाळी पाण्याची योग्य सोय अद्याप केलेली नाही. जी काही व्यवस्था केलेली आहे ती कुचकामी ठरत आहे. त्यातच आता पूर्ण झालेल्या उड्डाण पुलावरूनही पाणी खाली कोसळत आहे. पुलाच्या मध्यभागीही धो धो पाणी खाली पडत असल्याने भर पावसात या पुलाखालील रस्त्यावर वाहने हाकणेही कठीण ठरणार आहे. पुलाच्या खाली अनेक ठिकाणी अशा प्रकारे पाणी कोसळत असून या पुलाच्या कामात बऱयाच कमतरता राहिल्याचे दिसत आहे. या त्रुटी पावसाळय़ात दूर करणे शक्य आहे. या प्रकाराबाबत स्थानिक लोकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे.