डेनेज चेंबर ओव्हरफ्लो : घरांमध्ये पाणी शिरले : स्मार्ट सीटीबाबत प्रश्नचिन्हच
प्रतिनिधी /बेळगाव
वडगाव, आनंदनगर परिसरात गटारी नसल्याने सांडपाण्याचा निचरा व्यवस्थित होत नाही. बहुतांश नागरिकांनी टेरेसचे पाणी डेनेज वाहिन्यांना जोडले आहे. परिणामी पावसाचे पाणी रस्त्यावरून आणि डेनेज चेंबर ओव्हरफ्लो होऊन वाहत आहे. त्यामुळे काही घरांमध्ये पाणी शिरल्याचे निदर्शनास आल्याने रहिवाशांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.
स्मार्ट सिटीच्या नावाखाली कोटय़वधी निधी खर्च करण्यात आला आहे. पण प्रत्यक्षात काही ठरावीक भागात विकास कामे राबविण्यात आल्याने नेहमी निर्माण होणाऱया समस्या जैसे थे आहेत. त्यामुळे स्मार्ट सिटी झाली कुठे? असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे. वडगाव परिसरातील संपर्क रस्त्याचा विकास स्मार्ट सिटी योजनेंतर्गत केला जात आहे. पण हे काम देखील वर्ष भरापासून रखडले आहे. अनगोळ, वडगाव परिसरातील रस्त्या शेजारील गटारी बुजल्या आहेत. काही भागात गटारीचे बांधकाम करण्यात आले नाही. त्यामुळे पावसाच्या पाण्याचा निचरा होण्यासाठी गटारी नसल्याने रस्त्यावरूनच पावसाचे पाणी वाहत असते. पावसाच्या पाण्याचा निचरा होण्यासाठी गटारी बांधणे आवश्यक आहे. पण महापालिका प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केले आहे.
बहुतांश इमारतधारकांनी टेरेसवरील पाणी थेट डेनेज वाहिन्यांना जोडले आहे. त्यामुळे पावसाळय़ात टेरेसवर जमा होणारे पाणी डेनेज वाहिन्यांमधून वाहते. वास्तविक पाहता ड्रेनेज वाहिन्यांचा आकार लहान असून, संपूर्ण शहरातील सांडपाण्याचा ताण डेनेज वाहिन्यांवर पडतो. काही ठिकाणी डेनेज चेंबर तुंबलेले असतात. परिणामी डेनेज वाहिन्यांमधील सांडपाण्याचा निचरा व्यवस्थित होत नाही. त्यामुळे पावसाळय़ात डेनेज चेंबर ओव्हरफ्लो होत असल्याचे निदर्शनास येत आहे. काही ठिकाणी रस्त्यावरून पावसाचे पाणी वाहत असते. तर काही ठिकाणी डेनेज ओव्हरफ्लो होऊन पाणी वाहत असते. यामुळे रस्त्यावर पाणीच पाणी होत आहे. काही रहिवाशांच्या घरांमध्ये रस्त्यावरील पाणी शिरत असल्याने नाहक त्रास सहन करावा लागत आहे. महापालिका प्रशासनाने कोणतेच नियोजन व्यवस्थित केले नसल्याने रहिवाशांना याचा फटका बसत आहे. काही ठिकाणी रस्त्यावर खड्डे असल्याने पावसाचे पाणी भरल्यानंतर खड्डय़ाचा अंदाज वाहनधारकांना येत नाही. त्यामुळे अपघात देखील घडत आहेत. अशा अनेक समस्यांचा सामना आनंदनगर वडगाव परिसरातील रहिवाशांना करावा लागत आहे. त्यामुळे या समस्यांचे निवारण करण्याच्या दृष्टीने पाऊले उचलण्याची मागणी होत आहे.