प्रतिनिधी,कोल्हापूर
केंद्र सरकार आणि राज्य सरकारकडून शहरातील कचरा निर्गतीकरण करण्यासाठी कोट्यावधी रुपयांचा निधी येत आहे.तरीही कचऱ्याचे डोंगर कमी न होता वाढत असल्याची स्थिती निर्माण झाली आहे. निधी खर्चूनही कामात सुधारणा नाही. निधीचा वापर कशासाठी केला जातोय?, निधी नेमका जातो कुठे?असा सवाल राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी सोमवारी केला. येत्या पंधरा दिवसांत कचऱ्याच्या निर्गतीकरणासंदर्भात कार्यवाही झाली नाही तर अधिकाऱ्यांची गय केली जाणार नाही,असा इशाराही त्यांनी दिला.
शहरातील कचरा उठाव, झूम प्रकल्पातील कचऱ्याचे वाढणारे डोंगर आणि कचऱ्यावर होणारी प्रकिया याबाबत क्षीरसागर यांनी लाईन बझार येथील झूम प्रकल्पाची पाहणी केली.यावेळी त्यांनी कचरा उठाव आणि निर्गतीकरण प्रक्रियेचा आढावा घेतला.स्थानिक नागरिकांनीही महानगरपालिकेच्या भोंगळ कारभाराच्या अनेक तक्रारी यावेळी मांडल्या.बायोमायनिंगसाठी सुमारे 19 कोटी निधी मंजूर झाल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.कचरा उठावाची 30 वाहने बंद असल्याचे निदर्शनास आले.यावर आक्रमक होत क्षीरसागर यांनी महापालिकेच्या अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले.
क्षीरसागर यांनी, झूम प्रकल्पातील कचरा गोळा करणाऱ्या एका महिलेचा मृत्यू झाला आहे.तरीही याठिकाणाहून कचरा घेवून जाण्याचे काम खुलेआम चालू आहे.यामुळे पुन्हा याठिकाणाहून नेणाऱ्याच्या जीवितास धोका आहे. तरी तत्काळ यावर निर्बंध आणावेत.शहरातील कचरा उठाव वेळेवर होत नाही.उठाव केलेल्या कच्रयावर वेळेत प्रक्रिया होत नसल्याने कचऱ्याचे डोंगर उभे राहत आहेत.कचरा उठावातील अनियमितता यामुळे शहरात साथीचे रोग पसरत चालले आहेत.तीन दिवसांपूर्वी 18 वर्षाच्या तरुणाचा डेंग्यूच्या विकाराने मृत्यू झाला महानगरपालिका अधिकाऱ्यांचे काम पाहता लोकांच्या जीवाशी खेळण्याचा प्रकार सुरु आहे.प्रशासनाने आपली जबाबदारी ओळखून कार्यतत्परतेने काम करावे.शहरात नियमितपणे औषध फवारणी करावी.झूम प्रकल्पातील कचऱ्याचे डोंगर कमी करण्यासाठी आवश्यक प्रक्रिया तत्काळ राबवा.15 दिवसांनी याठिकाणी पुन्हा पाहणी करण्यात येणार आहे.तोपर्यंत कामात सुधारणा झाल्याचे दिसून आले पाहिजे.अन्यथा गय केली जाणार नाही.संबधितांवर कारवाई करण्यात येईल,असा इशाराही क्षीरसागर यांनी दिला.यावेळी अतिरिक्त आयुक्त रविकांत आडसूळ,उपआयुक्त साधना पाटील,शहर अभियंता हर्षजीत घाटगे, मुख्य आरोग्य निरीक्षक डॉ. विजय पाटील,शिवसेना शहर समन्वयक सुनील जाधव आदी उपस्थित होते.