कसबा बीड येथे राजर्षी शाहू कुंभी बचाव पॅनेलचा प्रचार शुभारंभ
कसबा बीड / विश्वनाथ मोरे
कसबा बीड ( ता. करवीर ) येथे कुंभी- कासारी सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणूकीच्या निमित्ताने गुरुवारी राजर्षी शाहू कुंभी बचाव पॅनेलचा महादेव मंदिरामध्ये प्रचार शुभारंभ करण्यात आला. यावेळी कुंभी कासारी साखर कारखान्यास राजकारणाचा अड्डा बनविल्याने कर्जात गेला. कुंभी कासारी साखर कारखाना गतवैभव मिळवून देण्यासाठी एकत्र येणे गरजेचे आहे, असे गोकुळचे संचालक बाळासाहेब खाडे यांनी आवाहन केले.
आपल्या भाषणात बोलताना ते म्हणाले, “कुंभी- कासारी कारखान्यावर नरके यांची सलग १८ वर्षे सत्ता आहे. ३०० कोटीचे कर्ज, ११ महिने पगार थकला, ग्रॅज्युएटी थकली असतांना शाळेच्या माध्यामातून वर्षाला २ कोटीचा घेऊन जात आहेत. कारखाना वाचवण्याचे सोडून कारखांना कर्जाच्या खाईत ढकलण्याचे काम सुरु आहे. सहकाराचे मंदिर असलेल्या कुंभी कारखान्याला वाचवण्यासाठी एकहाती सत्ता द्या, ही नव्या संर्घाषाची नांदी ठरेल.” असे ते म्हणाले.
पुढे बोलताना खाडे म्हणाले की, “शाहू आघाडीने १९९८ ते २००४ याकाळात सत्तेत असताना, महापुर, मावा अशी गंभीर परिस्थिती असतांना, साखरेची गोडाऊन फुल्ल होती. पण कधीही कामगार पगार, शेतकऱ्यांची बीले, तोडणी वहातूकीची देणी, बँकेची कर्जे थकली नाहीत. ९०० रूपये साखर असताना १२०० रूपये प्रतिटन दर दिला. सत्ता सोडताना शॉर्टमार्जिन असलेल्या किंमतीची साखर, स्पीरिट शिल्लक ठेवले होते. आघाडीने शेतकरी भवन, कुंभी शाळा, माती परिक्षण केंद्र, बी बियाणे देण्याच्या सुविधा निर्माण करून पारदर्शक कारभार केला; पण नरके यांनी आपल्या आमदारकीसाठी व्हीएसआयला चुकीचा अहवाल देत सहवीज प्रकल्प केला. आमदारकी टिकली पाहीजे, म्हणून राजकारण करत राहिले. कुंभी सभासदांच्या मालकीचा व्हावा , ही कार्यकर्त्यांची धडपड आहे. ही नव्या संघर्षामुळे नांदी आहे.”
यशवंत बँकेचे अध्यक्ष एकनाथ पाटील म्हणाले, “पारदर्शक कारभाराच ठेंभा मिरवणाऱ्या नरके निवडणूक डोळ्यासमोर ठेऊन सभासदांची १५ दिवसाला ऊसबील द्यायला सुरुवात केली आहे. जर कारखाना चांगला चालवला असेल तर कामगारांचे पगार, तोडणी वाहतूकीची बीले का थकली ? व कर्ज का वाढली आहेत ?” असा प्रश्न केला.
माजी जिल्हा परिषद अध्यक्ष राहुल पाटील म्हणाले, “पाच वर्षांपूर्वी भोगावती वाचवण्यासाठी सभासदांनी परिवर्तन केले, तसेच कुंभी कासारी वाचवण्यासाठी परिवर्तन करुन राजर्षी शाहू पॅनेलच्या उमेदवारांना निवडून एकहाती सत्ता द्या, असे आव्हान केले.”
बाजीराव खाडे, यांनी शेअर्स विक्रीतून जमा झालेल्या पैशातून आता ऊसबीले दिली जात आहेत. राजकीय द्वेषाने गरीब शेतकऱ्यांना ऊसतोड मिळत नाही असे सांगितले.
पंचायत संमिती सदस्य राजेंद्र सूर्यवंशी आपल्या भाषणात बोलताना म्हणाले, “कुंभीला कर्जात घालविल्यामुळे वर्षाला ३५ कोटी रुपये व्याज द्यावे लागते तर डी. सी. नरके विद्यानिकेतनच्या माध्यमातून नरके कुटुंबीय दोन ते अडीच कोटी रुपये कुंभीतून कमाई करतात. उलट सभासदांना व कामगाराना स्वतःच्या हक्काच्या उत्पन्नासाठी वाट पाहत बसावे लागते, हे थांबविण्यासाठीच राजर्षी शाहू पॅनेल उभे केले आहे.”
जनसुराज्य पक्षाचे संपर्क- प्रमुख संजयसिंह दळवी म्हणाले कारखाना अडचणीत असल्याने बिनविरोध करण्यासाठी आमदार विनय कोरे साहेब यांनी मनापासून प्रयत्न केले, पण माजी आमदार चंद्रदीप नरके यांनी राक्षसी महत्त्वाकांक्षेपोटी बिनविरोधला प्रतिसाद दिला नाही. तर पुर्वी कुंभीचा संचालक होणं ही प्रतिष्ठा होती. आता ती राहीली नसून, विचार दडपण्याचे काम चालू असल्याचे मनोगत यशवंत बँकेचे माजी चेअरमन प्रकाश देसाई यांनी व्यक्त केले. यावेळी राहुल पाटील , शामराव सूर्यवंशी, बाजीराव खाडे, सुधीर देसाई, प्रा.वसंत पाटील, कॅप्टन उत्तम पाटील,दादुमामा कामिरे,टी एल पाटील आदी मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले.
राजर्षी शाहू कुंभी बचाव पॅनेल शुभारंभ प्रसंगी बाळासाहेब खाडे, संभाजी पाटील, राजेंद्र खानविलकर,राहुल पाटील, सुभाष पाटील ,राजेंद्र सूर्यवंशी,प्रकाश देसाई, शामराव सूर्यवंशी, एकनाथ पाटील,टी एल पाटील,शाहु काटकर,के डी सी संचालिका श्रृतिका काटकर,आकाराम पाटील चेतन पाटील, सज्जन पाटील,. श्रीपतराव दिवसे,बाबासो जाधव, बाबुराव जाधव आदि मान्यवर यांच्यासह पॅनेलचे सर्वच उमेदवार, सभासद, समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते. आभार कॉंग्रेस पक्षाचे करवीरचे तालुकाध्यक्ष शंकरराव पाटील यांनी मानले.