वाकरे / प्रतिनिधी
शासनाच्या किमान वेतन कायद्याप्रमाणे पिकांना हमीभाव देण्याचा कायदा करावा अशी मागणी करून साखरेला प्रतिक्विंटल ३७०० रुपये दर निश्चित करावा आणि इथेनॉलच्या किमती प्रतिलिटर ६५,६७ आणि ६९ रुपये कराव्यात अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी यांनी केली.
दोनवडे (ता. करवीर) येथे आयोजित केलेल्या पत्रकार बैठकीत माजी खासदार शेट्टी बोलत होते. माजी खासदार शेट्टी यांनी काँग्रेसचे बाळासाहेब थोरात मंत्री असताना शेतकरी हिताचे निर्णय न घेता शेतकऱ्यांवर अन्याय केल्याचे सांगून काँग्रेस आणि भाजपा या दोन्ही पक्षांनी शेतकऱ्यांची फसवणूक केल्याचे ते म्हणाले. त्यामुळे या दोन्ही आघाड्यापासून आपण बाजूला गेल्याचे ते म्हणाले. भाजपला रोखण्यासाठी राज्यात शिवसेना, काँग्रेस,राष्ट्रवादी एकत्र आले,त्यांना पाठिंबा दिला, त्यांचे उंबरे झिजवले, मात्र सत्ता आल्यानंतर शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर त्यांनी कोणताही निर्णय घेतला नाही.त्यांनी उसाचे बेकायदेशीररित्या एफआरपी चे दोन तुकडे केले. त्यामुळे आपण त्यांच्यापासून बाजूला गेल्याचे त्यांनी सांगितले.
केंद्राने रंगराजन समितीच्या शिफारसी स्वीकारल्या, त्यामुळे यातील ७० टक्के फायदा शेतकऱ्यांना तर ३० टक्के फायदा कारखान्यांना मिळाला, त्यामुळे शेतकऱ्याच्या पदरात चार पैसे मिळत असल्याचे ते म्हणाले. सध्या राज्यातील प्रागतिक पक्ष एकत्र येऊन विकास आघाडी उभा केली आहे.सध्या चळवळ मागे पडत असल्याने सत्ताधाऱ्यांवर अंकुश ठेवण्यासाठी प्रागतिक पक्ष पुढे येत असल्याचे ते म्हणाले. या आघाडीत १३ पक्ष आहेत, काही निवडणूक न लढवणारे पक्ष यामध्ये सहभागी झाले आहेत, त्यामुळे भविष्यात ही आघाडी मजबूत होणार असल्याचे ते म्हणाले.
यावेळी प्रदेशाध्यक्ष प्रा.जालिंदर पाटील,जिल्हाध्यक्ष जनार्दन पाटील, कुंभी कासारी अध्यक्ष बाजीराव देवाळकर, बाजीराव पाटील यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.