बेळगाव : शहर परिसरात राखी पौर्णिमा उत्साहात व तितक्याच उत्कटपणे साजरी करण्यात आली. गेल्या आठवडाभरापासून बाजारात राखी खरेदी करण्यासाठी महिलांची गर्दी झाली होती. टपाल खात्यानेसुद्धा टपालाद्वारे राखी पाठविण्याची सुविधा उपलब्ध करून दिली. त्यामुळे परगावी असणाऱ्या भावांना राखी पाठविणे बहिणींना शक्य झाले. विविध ठिकाणी तसेच घरोघरी बहिणींनी भावांना राख्या बांधल्या. राखी बांधण्याचा मुहूर्त सायंकाळनंतर चांगला असल्याने बहुतेक ठिकाणी हा मुहूर्त साधण्यात आला. यंदा बाजारपेठेत अनेकविध स्वरुपाच्या राख्या आल्या असल्या तरी चांदीची राखी हे आकर्षण ठरले. एकीकडे महिलांनी राखी खरेदीसाठी गर्दी केली, त्याचवेळी भावांनी बहिणींसाठी भेटवस्तू घेण्यासाठी बाजारपेठेत फेरफटका मारला. महागड्या मोबाईलपासून दागिने, साडी, रोख रक्कम अशा भेटी भावांनी बहिणींना दिल्या. समाजमाध्यमांवर राखी पौर्णिमेच्या शुभेच्छांची देवाणघेवाण दिवसभर सुरूच राहिली. दरम्यान, येथील मराठा लाईट इन्फंट्री येथेही राखी पौर्णिमा साजरी करण्यात आली. येथील जवानांना प्रामुख्याने अग्निवीरांना शहरातील शाळेच्या विद्यार्थिनी तसेच महिलांनी आवर्जून राखी बांधली. जवान हे देशाचे रक्षक आहेत. आमच्यासाठी रक्षणकर्ता, भाऊ तसेच धैर्याचे ते प्रतीक आहेत, अशा भावना महिलांनी व्यक्त केल्या.
जायंट्स सखीतर्फे जवानांना बांधल्या राखी
येथील जायंट्स सखीच्यावतीने मराठा लाईट इन्फंट्रीच्या जवानांना राखी बांधून रक्षाबंधन सण साजरा करण्यात आला. देशसेवेत असणाऱ्या सैनिकांना घरी जाता येत नसल्याने रक्षाबंधनदिनी बहिणीची उणीव भासते. ही जाणिव ठेवून जायंट्स सखीतर्फे 200 हून अधिक जवानांना औक्षण व मंगल तिलक लावून राख्या बांधल्या. याचे औचित्य साधून भगिनींकडून जवानांना वामनराव पै यांची पुस्तके भेट देण्यात आली. यावेळी अध्यक्षा विद्या सरनोबत, उपाध्यक्षा अपर्णा पाटील, शीतल पाटील, सुलक्षणा शिनोळकर, राजश्री हसबे, ज्योती अनगोळकर यांच्यासह सखीच्या पदाधिकारी उपस्थित होत्या.