नागरिकांची गैरसोय : मनपाचे दुर्लक्ष
बेळगाव : शहरवासियांच्या सुविधेसाठी महापालिकेकडून विविध योजना राबविल्या जातात. राणी चन्नम्मा चौकाचा परिसर रहदारीचा असल्याने या ठिकाणी पे अॅण्ड यूज स्वच्छतागृह उभारण्यात आले आहे. सदर स्वच्छतागृहाला टाळे ठोकण्यात आल्याने वापर पूर्णपणे बंद आहे. परिणामी नागरिकांची गैरसोय होत आहे. स्वच्छतागृह सुरू करण्याकडे कंत्राटदारांने दुर्लक्ष केले असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. पण याचा फटका सर्वसामान्य नागरिकांना बसत आहे. महापालिकेने लाखो रुपये खर्चून या ठिकाणी नवीन पे अॅण्ड यूज स्वच्छतागृहाची उभारणी केली आहे. शहरात विविध भागातील नागरिक येतात. चन्नम्मा चौक हा शहरातील मध्यवर्ती भागात असून परिसरात विविध शाळा, कॉलेज, रुग्णालये, सरकारी कार्यालये आहेत. त्यामुळे या चौकात नागरिकांची रहदारी मोठ्या प्रमाणात असते. रहदारीच्या ठिकाणी स्वच्छतागृहाची अडचण भासते. काही वेळा रुग्णालयात येणाऱ्या नागरिकांना मोठ्या अडचणींना तोंड द्यावे लागते. त्यामुळे या ठिकाणी महापालिकेने स्वच्छतागृहाची उभारणी केली आहे. तसेच सदर स्वच्छतागृह पे अॅण्ड यूज तत्त्वावर सुरू केले आहे. स्वच्छतागृहाची देखभाल करण्यासाठी महापालिकेने निविदा काढल्या होत्या. सदर निविदा प्रक्रियेत भाग घेऊन एका कंत्राटदाराने प्रत्येक महिन्याला 40 हजार रुपये मनपाला देण्याची तयारी दर्शवून बोली लावली होती. निविदा प्रक्रियेवेळी सर्वाधिक बोली लावण्यात आल्याने महापालिकेने सदर कंत्राटदाराला निविदा मंजूर केली होती. सदर कंत्राटदाराने काही महिने पे अॅण्ड यूज स्वच्छतागृह सुरू केले पण त्यानंतर सदर स्वच्छतागृहाला टाळे ठोकून बंद ठेवले आहे. याबाबत महापालिकेला कोणतीच सूचना दिली नाही. स्वच्छतागृह बंद असल्याने महापालिकेचा महसूल बुडत आहे. त्याचबरोबर शहरात येणाऱ्या नागरिकांची गैरसोयदेखील होत आहे. त्यामुळे महापालिका प्रशासनाने याकडे लक्ष देऊन सदर बंद असलेले स्वच्छतागृह सुरू करावेत, अशी मागणी होत आहे.