औरंगाबाद, पुणे / प्रतिनिधी :
भाजपाचे नेते रावसाहेब दानवे हे विचित्र आणि धोकेबाज राजकारणी असल्याची टीका शिवसेना नेते व औरंगाबादचे माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी मंगळवारी येथे केली. अर्जुन अंतिमत: श्रीकृष्णाचे म्हणजे उद्धव ठाकरे यांचेच ऐकतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
शिवसेनेचे नेते अर्जुन खोतकर यांनी दिल्लीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व भाजपा नेते रावसाहेब दानवे यांची भेट घेतल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. ईडी कारवाईचा ससेमिरा चुकविण्यासाठी खोतकर हे शिंदे गटात सामील होतील, अशीही चर्चा आहे. मात्र, दानवे यांचे कट्टर प्रतिस्पर्धी असलेल्या खोतकर यांचे अद्याप तळय़ात-मळय़ात सुरू असून, ते जालन्यात सविस्तरपणे आपली भूमिका मांडणार आहेत. या पार्श्वभूमीवर खैरे यांनी आपले मत प्रदर्शित केले आहे.
खैरे म्हणाले, रावसाहेब दानवे विश्वासार्ह व्यक्ती नाही. हा माणूस अतिशय धोकेबाज आहे. शिवसेना-भाजपाची युती असतानाही त्यांनी मला धोका दिला. एवढेच नव्हे, तर दानवे यांनी आपल्या स्वत:च्या मुलीचा संसार मोडला आहे. जालना जिल्हय़ातील अनेक लोकांचा दानवे यांच्यावर विश्वास नाही. ते क्षणाक्षणाला आपली विधाने बदलत असतात. भाजपाकडून शिवसेनेच्या नेत्यांवर ईडीच्या माध्यमातून दबाब टाकण्याचा प्रयत्न सुरू आहे. याचाच फटका खोतकर यांना बसत असून, त्यांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला जात आहे.
अर्जुन खोतकर कडवट शिवसैनिक
अर्जुन खोतकर हे ईडीच्या कामासाठी दिल्लीत गेले असल्याची कल्पना त्यांनी मला दिली होती. खोतकर हे कडवट शिवसैनिक आहेत. त्यामुळे ते कुठेही जाणार नाहीत. त्यांचे नाव अर्जुन असल्यामुळे उद्धव ठाकरे त्यांना श्रीकृष्णासारखे आहेत. त्यामुळे खोतकर उद्धव ठाकरे यांचेच ऐकतील. याबद्दल आपल्या मनात शंका नाही. अर्जुन खोतकर ही एकच व्यक्ती आहे, जी रावसाहेब दानवे यांना सरळ करू शकते, असा निशाणाही खैरे यांनी साधला.
हेही वाचा : कुस्तीगीर परिषदेचे अध्यक्षपद विदर्भाकडे