नागरी पुरवठा खात्याची अधिसूचना जारी : पालन न करणाऱ्यांवर होणार कडक कारवाई
प्रतिनिधी / पणजी
नागरी पुरवठा खाते हे गरीब व लोककल्याणासाठी महत्त्वाचे मानले जाते. प्रामुख्याने गरीब व गरजू लोकांना धान्यपुरवठा करण्यात येतो. गरीबांपर्यंत धान्यपुरवठा व्हावा, यासाठी खात्याचा प्रयत्न आहे. तरीही आर्थिक परिस्थिती चांगली असतानाही काही नागरिक शिधापत्रिकेद्वारे धान्य उचलत असल्याचे निदर्शनास आले आहे. म्हणून ज्या लाभार्थ्यांचे वार्षिक उत्पन्न पाच लाखांहून अधिक आहे, अशा रेशनकार्डधारकांनी आपली रेशनकार्डे नागरी पुरवठा खात्याकडे जमा करावी, अशी सूचना खात्यातर्फे करण्यात आली आहे.
50 हजार ऊपयांपेक्षा जास्त कौटुंबिक उत्पन्न असलेल्या आणि अंत्योदय अन्न योजना (एएव्हाय) शिधापत्रिका (गुलाबी रंगात) आणि प्राधान्य कुटुंब (पीएचएच) शिधापत्रिका (गुलाबी रंगात) असलेल्या नागरिकांनाही विभागाने दारिद्र्यारेषेवरील (एपीएल) मध्ये बदलण्यास सांगितले आहे.
तीस दिवसांत जमा करा, अन्यथा कारवाई
पाच लाखांहून अधिक उत्पन्न असणाऱ्या लाभार्थ्यांनी तीस दिवसांत रेशनकार्डे खात्यात जमा करावी. या सूचनेचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक फौजदारी कारवाई करण्याचा इशारा नागरी पुरवठा खात्याने दिला आहे.