रत्नागिरी प्रतिनिधी
प्रधानमंत्री फसल विमा योजनेंतर्गत पुनर्रचित हवामान आधारित फळपीक विमा योजना राज्यभरासह जिल्ह्यातही राबवण्यात येत आहे. राज्यातील इतर जिल्ह्यात बनावट फळपीक विम्यासंदर्भात कार्यवाही होताना आता रत्नागिरी जिल्ह्यातही बनावट फळपीक विम्याचे लोण येऊन पोहचले आहे. जिल्ह्यात तब्बल १० बनावट फळपीक विम्याची प्रकरणे उघडकीस आली आहेत. महत्वाचे म्हणजे ज्या १० शेतकऱ्यांनी ज्या पिकासाठी विमा काढला होता, ते पीकच या शेतकऱ्यांकडे आढळून आले नसल्याची माहिती जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालयाकडून देण्यात आली. कृषी क्षेत्राच्या उत्पादनात फळपिकांचा महत्वाचा वाटा असतो. अशावेळी फळपीकांना हवामानापासून होणाऱ्या धोक्यासाठी विम्याचे संरक्षण
देऊन शेतकऱ्यांना आर्थिक स्थैर्य प्राप्त करून देण्यासाठी ही योजना महत्वाची आहे. जिल्ह्यात २०२२-२३ वर्षातील या योजनेचे लाभार्थी ३२ हजार ४०० आहेत, त्या लाभार्थ्यांपैकी ९ हजार ४९६ जणांचे सर्वेक्षण पूर्ण झाले आहे. यातील २० जणांच्या दिलेल्या माहितीत सामान्य त्रुटी आहेत. मात्र १० शेतकरी असे आहेत, ज्यांनी आंबा पिकासाठी विमा उतरवला होता. मात्र हे पीकच या शेतकऱ्यांकडे सर्वेक्षणादरम्यान आढळून आले नाही. आता या १० शेतकन्यांवर शासनाकडून कारवाई करण्यात येणार असून त्यांनी भरलेला हप्ताही जप्त केला जाणार आहे. राज्यात उद्भवणाऱ्या बनावट फळपीक विम्याचा मुद्दा गाजत असताना रत्नागिरीतही प्रकरण उघडकीस आल्याने चिंता व्यक्त करण्यात येत आहे.
जिल्ह्यात जास्तीत-जास्त तपासणी पूर्ण करण्यात येणार आहे. शिवाय जे बनावट शेतकरी आढळले आहेत, त्यांच्यावर शासनाकडून कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती
तंत्र कृषी अधिकारी, विनोद हेगडे, कृषी विभाग, रत्नागिरी यांनी दिली.