जम्मू-काश्मीरमध्ये पोहोचली काँग्रेसची यात्रा
वृत्तसंस्था / कथुआ
काँग्रेस नेते राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा स्वतःच्या अंतिम टप्प्यात म्हणजेच जम्मू-काश्मीरमध्ये पोहोचली आहे. भारत जोडो यात्रेत शुक्रवारी खासदार संजय राऊत आणि नॅशनल कॉन्फरन्सचे अध्यक्ष फारुख अब्दुल्ला यांनी भाग घेतला आहे. जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारुख अब्दुल्ला यांनी यावेळी बोलताना राहुल गांधी यांची तुलना आदि शंकराचार्यांसोबत केली आहे.
शतकांपूर्वी शंकराचार्य काश्मीरमध्ये आले होते, तेव्हा रस्ते नव्हते, केवळ जंगलं होती. शंकराचार्य यांच्यानंतर कन्याकुमारी ते जम्मू-काश्मीरपर्यंत यात्रा काढणारे राहुल हे दुसरे व्यक्ती असल्याचे अब्दुल्ला यांनी म्हटले आहे. भारत जोडो यात्रेने गुरुवारी संध्याकाळी जम्मूमध्ये प्रवेश केला होता.
पाकिस्तानसोबत चर्चा केली जात नाही तोवर काश्मीरचा मुद्दा जिवंत राहणार आहे. पाकिस्तानशी चर्चा करत नाही तोवर दहशतवाद कायम राहणार असल्याचे स्वतःच्या रक्ताने लिहून देऊ शकतो. भारत जोडो यात्रेचा उद्देश द्वेषाविरोधात देशाला एकजूट करणे आहे. हा ‘गांधी’ आणि ‘रामा’चा देश असून येथे आम्ही सर्व एक आहोत. भारतात द्वेष पसरविला जात असून धर्मांना परस्परांच्या विरोधात उभे केले जात असल्याचे अब्दुल्ला म्हणाले.
देशात काँग्रेसशिवाय भाजपचा मुकाबला करण्याची केजरीवाल, अखिलेश यादव आणि केसीआर यासारख्या नेत्यांची मानसिकता चुकीची आहे. काँग्रेस एक राष्ट्रीय पक्ष असून देशभरात त्याचा विस्तार आहे. राहुल गांधी यांच्या नेतृत्वाला देशभरातील लोकांनी स्वीकारले आहे. राहुल गांधी यांना मी आवाज उठविणारा नेता म्हणून पाहत असल्याचे संजय राऊत यांनी म्हटले आहे.
भारत जोडो यात्रेमुळे देशभरात एका चांगल्या वातावरणाची निर्मिती झाली आहे. पठाणकोटमध्ये हजारो युवक-युवती हातांमध्ये मशाल घेऊन यात्रेत सामील झाल्या आहेत. मशाल हे काँग्रेसचे नव्हे तर शिवसेनेचे (उद्धव ठाकरे गट) चिन्ह आहे. देशात जागृती करण्यासाठी सर्वांच्या हातात मशाल आवश्यक असल्याचे उद्गार राऊत यांनी काढले आहेत.