पुणे / प्रतिनिधी :
राज्य मंडळातर्फे बारावीच्या विद्यार्थ्यांची पुरवणी परीक्षा 21 जुलै ते 12 ऑगस्ट या कालावधीत होणार आहे. या परीक्षेसाठी आतापर्यंत 52 हजार विद्यार्थ्यांनी नोंदणी केली असून, परीक्षेसाठीचे प्रवेशपत्रे विद्यार्थ्यांना ऑनलाईन उपलब्ध करून देण्यात आली आहेत. (Registration of 52 thousand students for the 12th supplementary examination) राज्य मंडळाचे सचिव डॉ. अशोक भोसले यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे ही माहिती दिली.
बारावीच्या मार्च-एप्रिलमध्ये झालेल्या परीक्षेतील अनुत्तीर्ण, श्रेणी सुधारू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी पुरवणी परीक्षा घेतली जाते. त्यानुसार बारावीची, बारावीच्या व्यवसाय अभ्यासक्रमाची परीक्षा 21 जुलैपासून सुरू होणार आहे. तसेच प्रात्यक्षिक, श्रेणी, तोंडी व अंतर्गत मूल्यमापन परीक्षा 20 जुलै, ते 8 ऑगस्ट या कालावधीत होईल. शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयांनी https://www.mahahsscboard.in या संकेतस्थळाद्वारे उपलब्ध करून दिलेल्या प्रवेशपत्राची प्रत काढून त्यावर मुख्याध्यापकांनी शिक्का आणि स्वाक्षरी करून विद्यार्थ्यांना द्यावी. त्यासाठी वेगळे शुल्क घेऊ नये. प्रवेशपत्रातील माध्यम आणि विषय याबाबत बदल असल्यास शाळा, कनिष्ठ महाविद्यालयांनी त्या विभागीय मंडळातून दुरुस्त करून घ्याव्यात, प्रवेशपत्रातील छायाचित्र, नाव, स्वाक्षरी याबाबत दुरुस्ती शाळा, कनिष्ठ महाविद्यालयांनी त्यांच्या स्तरावर करून त्याची एक प्रत विभागीय मंडळाला पाठवावी, प्रवेशपत्र गहाळ झाल्यास दुसरी प्रत देऊन त्यावर द्वितीय प्रत असा शेरा द्यावा, असे स्पष्ट करण्यात आले आहे.
हेही वाचा : टीएमसी, क्युसेक आणि क्युमेक म्हणजे नेमकं काय?
डॉ. भोसले म्हणाले, की बारावीच्या विद्यार्थ्यांना पुरवणी परीक्षेसाठी 19 जुलैपर्यंत नोंदणी करता येईल. आतापर्यंत 52 हजार विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. त्यामुळे उर्वरित कालावधीत आणखी काही विद्यार्थ्यांची नोंदणी होईल.