ऑनलाईन टीम / तरुण भारत :
राज्यात सर्वदूर जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. धरणक्षेत्रात पावसाचा जोर वाढल्याने धरणातील पाणीसाठ्यातही वाढ होत आहे. धरणे भरताना इतके टीएमसी पाणी जमा झाले, तितके क्युसेक पाणी सोडण्यात आले, असे सांगितले जाते. पण या संज्ञांचा नेमका अर्थ काय? याचा अर्थ आपण समजून घेणार आहोत.
टीएमसी म्हणजे काय?
धरणातील पाणीसाठा टीएमसी आणि दलघमीमध्ये मोजला जातो. 1 टीमसी म्हणजे (Thousand Million Cubic Feet) म्हणजेच 100 कोटी घनफूट पाणी. तर दलघमी म्हणजे दहा लाख घनमीटर पाणी. 1 टीमसीमध्ये 28 अब्ज लिटर पाण्याचा समावेश असतो.
क्युसेक आणि क्युमेक म्हणजे काय?
नदीतून वाहणाऱ्या पाण्याचा वेग किंवा धरणातून सोडण्यात येणाऱ्या पाण्याचा वेग मोजण्याठी क्युसेक आणि क्युमेक ही एकके वापरली जातात. क्युसेक म्हणजे घनफूट प्रतिसेकंद आणि क्युमेक म्हणजे घनमीटर प्रतिसेकंद. एका सेकंदास एक घनफूट पाण्याचा प्रवाह म्हणजे एक क्युसेक होय. (1Cusec= 1 Cubic feet/sec) म्हणजेच एका सेकंदात 28.3 लिटर पाणी बाहेर पडते.
तर एका सेकंदास एक घनमीटर पाण्याचा प्रवाह म्हणजे एक क्युमेक होय. (1Cumec= 1 Cubic Meter/sec) म्हणजेच एका सेकंदात 1,000 लिटर पाणी बाहेर पडते.
उदा. पुण्याच्या खडकवासला धरणाची क्षमता 1.97 टीएमसी आहे. म्हणजेच त्यामध्ये 1.97 x 28.317 अब्ज लिटर्स पाणी मावते. जर धरणातून 500 क्युसेक पाणी नदीत सोडले जात असेल तर 500 x 28.317 लिटर प्रति सेकंद या विसर्गाने पाणी सोडले जात आहे.
पांढरी, निळी आणि लाल रेषा म्हणजे काय?
धरणातून 30,000 क्युसेक पाणी सोडले तर त्या नदीपात्राची पाणीपातळी वाढते. त्यानंतर पाणी पातळी जेथे पोहचते ती रेषा ‘पांढरी रेषा’ म्हणून ओळखली जाते.
हेही वाचा : हिंगोलीत ढगफुटी : कुरूंदा, किन्होळा गाव पाण्याखाली
धरणातून 60,000 क्युसेक वेगाने पाणी सोडल्यानंतर नदीपात्रातील पाणी पातळी जेथे पोहचेल ती रेषा ‘निळी रेषा’ म्हणून ओळखली जाते.
धरणातून 1,00,000 क्युसेक वेगाने पाणी सोडले गेल्यावर नदीपात्रातील पाणी पातळी जेथे पोहचेल ती रेषा ‘लाल रेषा’ म्हणून ओळखली जाते