नवनिर्वाचित आमदार, खासदारांनी पुन्हा बैठक घेऊन निर्णय घेण्याची पश्चिम भागातील जनतेची मागणी
उचगाव /वार्ताहर
चंदगड तालुक्यातील तिलारी धरणातील पाणी मार्कंडेय नदीत सोडण्याचा प्रस्ताव कर्नाटक, महाराष्ट्रातील मंत्री व आमदार यांच्या बैठकीत जुलै 2020 साली मांडून जवळपास तीन वर्षे होत आली. दोन्ही राज्यातील मंत्री, आमदार, खासदार यांनी मांडलेल्या बैठकीतील या प्रस्तावावर अद्याप पुन्हा चर्चा झालेली नाही. आता नवनिर्वाचित आमदार, खासदारांनी या धरणातील पाणी मार्कंडेय नदीत सोडण्यासाठी पुन्हा बैठक घेऊन यावर तातडीने निर्णय घ्यावा अशी मागणी बेळगावच्या पश्चिम भागातील जनतेने केली आहे.
या प्रस्तावामुळे सीमाभागातील तमाम मराठी बांधवामध्ये समाधान व्यक्त करण्यात आले होते. चंदगड व बेळगाव भागातील सर्व मंत्री, खासदार, आमदार यांची संयुक्त बैठक आयोजित करून या कामाला प्रारंभ करावा अशी मागणीही यावेळी शेतकऱ्यांनी केली होती. मार्कंडेय नदीत पाणी सोडल्यास बेळगावच्या पश्चिम भागासह तालुक्यातील काही भागातील शेतकऱ्यांच्या पिकासाठी हे पाणी उपयुक्त ठरणार असल्याची प्रतिक्रिया शेतकरी वर्गातून व्यक्त होत आहे.
चंदगड तालुक्याचे विद्यमान आमदार राजेश पाटील यांनी शेतकरी वर्गाच्या दृष्टीने मांडलेला बैठकीतील मुद्दा अतिशय महत्त्वाचा होता. मुंबई येथील सह्याद्री अतिथीगृहात महाराष्ट्राचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील व कर्नाटकाचे जलसंपदा मंत्री रमेश जारकीहोळी यांच्या अध्यक्षतेखाली दोन्ही राज्यांचे सचिव व जलसंपदा खात्याचे प्रमुख अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत बैठक पार पडली होती.
तिलारी धरणाचे पाणी आल्यास सीमा भागाचा कायापालट
मार्कंडेय नदीच्या दुतर्फा हजारो एकर सुपीक जमीन आहे. जर या नदीच्या पात्रात बारा महिने पाणी राहिले तर वर्षभर जमिनीत वेगवेगळी पिके डोलू लागतील. मार्च, एप्रिल, मे महिन्यामध्ये पिके भरणी, काढणीच्या काळात मार्कंडेय नदी कोरडी पडते यामुळे पिकांचे मोठे नुकसान होते. यासाठी तिलारी धरणातील पाणी या नदीमध्ये सोडले तर या भागाचा खऱ्या अर्थाने कायापालट होईल. मात्र ही सर्व मदार आता दोन राज्यांच्या नेतेमंडळींवर अवलंबून आहे.
सीमाभागातील जमीन ओलिताखाली येईल
या वेळी चंदगडचे आमदार राजेश पाटील या बैठकीत म्हणाले होते. तिलारी धरणांमध्ये पाणीसाठा मुबलक आहे जादा पाणी जंगल भागात सोडले जाते हेच पाणी जर मार्कंडये नदीला सोडले तर सीमाभागातील लाखो शेतकऱ्यांच्या जमिनी ओलिताखाली येतील आणि शेतकऱ्यांचे उत्पादन वाढून शेतकरी आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी मदत होईल. यासाठी सदर पाणी सोडण्यासंदर्भात त्यांनी त्या बैठकीत प्रस्ताव मांडला होता.
आतापासून चर्चा करणे गरजेचे
याबाबत आतापासूनच चर्चेला प्रारंभ केला तर, नजीकच्या काळात उन्हाळ्यामध्ये पाण्यासाठी शेतकऱ्यांची होणारी भटकंती थांबेल. यासाठी तातडीने चंदगडचे आमदार राजेश पाटील, बेळगाव ग्रामीणच्या आमदार लक्ष्मीताई हेब्बाळकर यांनी पुढाकार घेऊन यावर तातडीने निर्णय घ्यावा अशी मागणी या दोन्ही तालुक्यातील शेतकरी वर्गाने केली आहे.