ऑनलाईन टीम / तरुण भारत :
EWS प्रमाणपत्राची अट शिथिल करत राज्य सरकारने स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांना मोठा दिलासा दिला आहे. आता EWS प्रमाणपत्र नसेल तरीही विद्यार्थ्यांना मुलाखतीला जाता येणार आहे. याबाबतचा शासन निर्णय प्रसिद्ध करण्यात आला आहे.
मागील काही महिन्यांपासून स्पर्धा परीक्षेचे विद्यार्थी आपल्या मागण्या सरकारपुढे मांडत होते. त्यामधील काही मागण्या सरकारने मान्य केल्या होत्या. दरम्यान, कोरोना काळात EWS प्रमाणपत्र न निघाल्याने विद्यार्थ्यांची मोठी अडचण झाली होती. त्यासाठी त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली होती. या भेटीनंतर राज्य सरकारने EWS प्रमाणपत्राची अट शिथिल करण्याचा निर्णय घेतला. आता EWS प्रमाणपत्र नसेल तरीही विद्यार्थ्यांना मुलाखतींसाठी संधी देण्याची मुभा देण्यात आली आहे. या निर्णयासाठी स्पर्धा परिक्षेच्या विद्यार्थ्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानले आहेत.