स्थानिक नागरिकांची मागणी : मनपा आयुक्तांना निवेदन
बेळगाव : पाटील गल्ली, वडगाव येथील धोकादायक वृक्षाकडे वनखाते आणि मनपाचे दुर्लक्ष झाले आहे. याबाबत कित्येकवेळा तक्रार देऊनदेखील वनखाते उदासीन असल्याचे दिसत आहे. हा धोकादायक वृक्ष तातडीने हटवावा, अशी मागणी मनपा आयुक्तांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. पाटील गल्ली येथील स्थानिक नागरिकांनी आयुक्तांकडे निवेदन सादर करून धोकादायक वृक्ष हटविण्याची मागणी केली आहे. पाटील गल्ली येथील विष्णू भुजंग चतुर यांच्या घराजवळ हा धोकादायक वृक्ष आहे. त्यामुळे येथून ये-जा करणे धोक्याचे बनू लागले आहे. शिवाय वाहतुकीला अडथळा निर्माण होवून अपघात घडू लागले आहेत. याबाबत वनखात्यालादेखील निवेदन देण्यात आले आहे. मात्र याकडे सोयिस्कर दुर्लक्ष करण्यात आले आहे. सदर वृक्षाचा सर्व्हे करून तातडीने हा वृक्ष हटवावा आणि नागरिकांना दिलासा द्यावा, अशी मागणी स्थानिकांनी केली आहे. यावेळी माजी नगरसेवक मनोहर हलगेकर, मारुती हानगोजी, नागेश यल्लुपाचे, नीळकंठ बेळगावकर, मारुती बेळगावकर, प्रकाश हलगेकर, मारुती कुंडेकर, महेश चतुर आदी नागरिकांनी निवेदन सादर केले.