चार दिवसांपासून जळणाऱ्या कचऱ्यामुळे परिसरात धुराचे लोट
पाचगाव प्रतिनिधी
मोरेवाडी ग्रामपंचायतीच्या भारती विद्यापीठ जवळील कचरा डेपो मधून चार दिवसांपासून जळणाऱ्या कचऱ्यामुळे धुराचे लोट सर्वत्र पसरले आहेत.यामुळे परिसरातील नागरिकांना त्याचा त्रास होत आहे.या धुरामुळे अनेकांना श्वसनाचा त्रास होऊ लागला आहे.
मोरेवाडी ग्रामपंचायत मार्फत आर के नगर, मोरेवाडी परिसरातील कचरा घंटा गाडी द्वारे गोळा करण्यात येतो. हा गोळा केलेला कचरा भारती विद्यापीठ जवळ टाकण्यात येतो. या ठिकाणी मोठ्या प्रमाणात कचऱ्याचे ढीग तयार झाले आहेत. हा कचरा जाळल्यामुळे गेल्या चार दिवसांपासून या ठिकाणाहून मोठ्या प्रमाणात धूर बाहेर पडत आहे.
या कचरा डेपोला लागूनच भारती विद्यापीठ कॉलेज आणि आरटीओ विभागाचे वाहन तपासणी केंद्र आहे. या ठिकाणीही वाहन चालकांना धुराचा त्रास होत आहे. या धुरामुळे प्रदूषणात वाढ होत आहे. सुमारे पाच वर्षांपूर्वी मोरेवाडी ग्रामपंचायतीला लाखो रुपयांचे कचऱ्यावर प्रक्रिया करणारे अत्याधुनिक मशीन मिळाले आहे. मात्र ग्रामपंचायतीने या मशीनचा एकदाही वापर केलेला नाही. यामुळे या मशीन साठी शासनाने खर्च केलेली लाखो रुपये मोरेवाडी ग्रामपंचायतीने पाण्यात घालवले आहेत असा आरोप मोरेवाडी चे ग्रामस्थ अण्णासो मोरे यांनी केला आहे. मोरेवाडी कचरा डेपो मधील कचऱ्याला आग लावून वायु प्रदूषण करणाऱ्या संबंधितांनवर प्रदूषण नियंत्रण मंडळांने तात्काळ कारवाई करावीअशी मागणी ग्रामस्थांमधून होत आहे.