100 वर्षांपूर्वीचा पूल वाहतुकीसाठी धोकादायक
वार्ताहर /जांबोटी
बेळगाव-चोर्ला राज्य महामार्गावरील कुसमळी गावाजवळील मलप्रभा नदीवरील ब्रिटिशकालीन पुलाकडे सरकारचे साफ दुर्लक्ष झाले आहे. या पुलावरील रस्त्याची दुर्दशा झाल्यामुळे हा पूल वाहतुकीसाठी धोकादायक बनल्यामुळे बेळगाव-गोवा आंतरराज्य वाहतूक बंद होण्याची दाट शक्यता आहे.
बेळगाव-जांबोटी रस्त्यावर कुसमळी गावानजीक मलप्रभा नदीवर शंभर वर्षापूर्वी ब्रिटिश कालावधीत दगड व चुनखडीचा वापर करून या पुलाचे बांधकाम करण्यात आले होते. मात्र वाढत्या अवजड वाहतुकीच्या भारामुळे हा पुल ढासळत चालला असून वाहतुकीला धोकादायक बनला आहे. या पुलाला अनेक ठिकाणी भगदाड पडले असून पुलावर मोठय़ा प्रमाणात खड्डे पडले आहेत. पुलावर खड्डय़ामुळे डबक्मयांचे स्वरूप प्राप्त झाल्यामुळे येथून वाहनधारकांना जीवमुठीत घेऊन वाहने चालवावी लागत आहेत. तसेच हा पूल अत्यंत अरुंद असल्यामुळे अवजड वाहनांच्या वर्दळीमुळे अनेकवेळा लहान मोठी वाहने अडकून दिवसभर वाहतूक ठप्प होते.
बेळगाव-पणजी व्हाया चोर्ला या रस्त्याने बेळगाव-गोवा हे अंतर 40 कि. मी. ने कमी होत असल्यामुळे या रस्त्यावरुन मोठय़ा प्रमाणात गोव्याला वाहतूक असते. कुसमळी नजीकच्या मलप्रभा नदीवरील नवीन पुल बांधावा या मागणीसाठी जांबोटी भागातील नागरिकांनी शासनाकडे अनेकवेळा अर्ज केले, मात्र त्याकडे साफ दुर्लक्ष झाले आहे. सार्वजनिक बांधकाम खात्याकडून पुलाच्या दुरुस्तीच्या नावाखाली दरवषी केवळ पुलावरील संरक्षक कठडय़ांची दुरुस्ती, तसेच पुलावरील रस्त्याचे डांबरीकरण रंगरंगोटी केली जाते. अशा प्रकारे शासनाच्या लाखो रुपयांचा दरवषी चुराडा करण्यात येत असल्यामुळे, नागरिकांतून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.
पुलाच्या बांधकामाचा प्रस्ताव लालफितीत अडकला कुसमळी नजीकचा ब्रिटिशकालीन पूल हटवून त्या ठिकाणी नवीन पूल बांधण्याचा प्रस्ताव 2007 पासून सरकारच्या विचारधीन आहे. परंतु, सदर प्रस्ताव अद्याप लालफितीतच अडकून पडला आहे. दोन वर्षापूर्वी या पुलाच्या बांधकामासाठी 12 कोटीचा निधी मंजूर करण्यात आला होता. मात्र, त्याची अद्याप निविदा देखील मंजूर झाली नसल्यामुळे, या पुलाच्या बांधकामाचा प्रश्न वर्षानुवर्षे लालफितीत अडकून पडला आहे. मागील दोन वर्षापूर्वी या पूलाचे स्ट्रक्चर ऑडिट करून हा पूल वाहतुकीसाठी धोकादायक असल्याचा अहवाल शासनाला पाठवण्यात आला आहे. परंतु, अद्याप सदर प्रस्तावावर कोणतीही कार्यवाही झालेली नाही. या ठिकाणी मोठी दुर्घटना घडवून बळी गेल्यानंतर शासन जागे होणार का, असा प्रश्न नागरिक उपस्थित करत आहेत.