विशेष प्रतिनिधी / पणजी
सदानंद शेट तानावडे! भारतीय जनता पार्टी गोव्याचे अध्यक्ष ज्यांच्या कारकिर्दीचा आलेखच चढता आहे. पंचायत, पालिका, जिल्हा पंचायत आणि विधानसभा या सर्व निवडणुकांमध्ये भाजपचे झेंडे फडकले जाईल त्या सर्व निवडणुकांमध्ये केवळ भाजप आणि भाजपच. त्यातून विरोधकांचे संख्याबळ घटवून टाकण्यातही महत्त्वाच्या भूमिका. हे करित असताना राज्य सरकारशी सौहार्दपूर्ण संबंध. तानावडेंच्या तीन वर्षांच्या कारकिर्दीची ही आहे यशोगाथा.
गेले तीन वर्षे भारतीय जनता पार्टी सातत्याने काम करित आहे, राबत आहे. अध्यक्ष तानावडे यांनी दिवसाकाठी ज्या काही आतापर्यंत सभा घेतल्या त्यांची संख्या निश्चित सांगता येणार नाही. परंतु, सरांसरी दिवसाकाठी 6 ते 7 बैठका त्यांनी घेतल्या. निवडणुकांना दोन वर्षे असताना तानावडेंच्या कामाचा जोर एवढा वाढला की जणू काही महिन्या दीड महिन्यांवर निवडणुका ठेवल्या आहेत. परंतु, कधीही व कोठेही न कंटाळता हा माणूस राबत राहिला. उगाच नाही पक्षाला यश मिळालं! त्यासाठी राबराब राबावे लागते. आजवर गोव्यात निवडणुका जवळ आल्यानंतर राजकीय पक्ष तंबू ठोकून उभे असायचे. परंतु भाजने जे काही नेते व पदाधिकारी निवडले त्या सर्वांचे काम हे पूर्णवेळ राजकारणासाठीच आहे.
तानावडे म्हणाले की, आपण कधीही कोणावर सूडाने वागलो नाही वा तशी भावनाही मनात नाही. पक्ष हा एका व्यक्तीवर चालत नसतो त्यासाठी हजारो पदाधिकारी, लाखो कार्यकर्ते काम करीत असतात. त्यापैकीच मी एक सामान्य कार्यकर्ता म्हणून काम केले. सर्वांना बरोबर घेऊन गेलो, सर्वांच्या सहकार्याने पक्षाची धेय, धोरणे पुढे नेण्याचे काम आम्ही केले. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांचे पक्षाला नेहमीच सहकार्य मिळाले. आपले मुख्यमंत्र्यांशी व मुख्यमंत्र्यांचे आपल्याशी नेहमीच सहकार्याचे संबंध राहिले व पक्षाची तत्वे व धोरणे राबविताना मुख्यमंत्र्यांनी नेहमीच पुढाकार घेतला. आपल्याला स्वतःला कोणत्याही पदाची अपेक्षा नव्हती. त्यामुळेच अध्यक्ष झाल्यानंतर आपण विधानसभा निवडणूक लढविणार नाही अशीच भूमिका घेतली आणि शेवटपर्यंत त्या निर्णयाशी ठाम राहिलो.
कार्यकर्त्यांनी दिलेले सहकार्य आणि सरकारशी असलेले मित्रत्वाचे नाते. मुख्यमंत्री नेहमीच कामात व्यस्त असून देखील पक्षाच्या प्रत्येक कार्यक्रमात हिरिरीने सहभागी झाले. पक्ष आणि सरकार यांच्या दरम्यान चांगले संबंध प्रस्थापित झाले. हे करीत असताना ऐन निवडणुकीच्या तोंडावर काही नेत्यांची समजूत काढण्यात आपण अपयशी ठरलो व ती मंडळी पक्ष सोडून गेली हे शल्य सतत मनाला बोचत राहिले. पक्षासाठी दिवस रात्र राबत असल्यामुळे तीन वर्षे कशी संपली हे लक्षात देखील आले नाही. सरकार असल्यामुळे पक्ष आणि सरकार यांच्या दरम्यान चांगले संबंध निर्माण होणे आवश्यक असते. ते झाले त्यामुळेच आमचा पक्ष सर्व पातळीवर यशस्वी झाल्याचे तानावडे म्हणतात.
आपल्या कारकिर्दीत आपण अनेक नव्या कार्यकर्त्यांना व नेत्यांना जोडले. पक्षातर्फे आयटी सेल, ऍडव्होकेट सेल, हॉक्टर्स सेल, क्रीडा सेल असे अनेक विभाग सुरु केले. हे सर्व विभाग कार्यरत ठेवले व या विभागातर्फे जोरदार कामही सुरु केले. पक्षाच्या प्रत्येक कार्यक्रमाला मुख्यमंत्र्यांनी जे प्राधान्य दिले त्यातच आमच्या पक्षाचे यश आहे, असे तानावडे म्हणाले.
कोणताही पक्ष जनतेत रुजविण्यासाठी पक्षाच्या नेत्यांनी पूर्णवेळ राजकारण केले पाहिजे. राजकारण हे समाजसेवेचे व्रत आहे हे विसरुन चालणार नाही. आमचा भारतीय जनता पक्ष हा 24ƒ7 या प्रमाणे काम करीत राहिला त्यामुळेच आम्ही हे यश संपादन करु शकलो, असे सदानंद तानावडे यांनी सांगितले.
संघटनात्मक काम करताना आपण कधीही तडजोड केली नाही. सरकार म्हणून पक्ष पुढे नेताना काही गोष्टींमध्ये तडजोड करावी लागली परंतु पक्ष संघटनेच्या बाबतीत कोणतीही तडजोड आम्ही करीत नसतो. विधीमंडळ नेत्यांना देखील पक्षाच्या तत्वानुसारच जावे लागेल तशी सूचना त्यांना दिलीच होती. पक्षाला गेल्या तीन वर्षात खूपच चांगले यश प्राप्त झाले आणि कोणतीही कामे करताना केवळ माझी खुर्ची टिकविण्यासाठी कामे केली नाहीत. पक्षाच्या तत्वानुसारच व पक्ष वाढीसाठीच आपण काम केल्याचे सदानंद तानावडे यांनी स्पष्ट केले. मला माझ्या पदापेक्षा व मला काय मिळेल? याचा कधीही आपण विचार केला नाही तर पक्ष संघटना मजबूत कशी होईल? हाच विचार व हेच धेय बाळगून आपण कार्यरत राहिलो. पक्षाला आलेले यश हे प्रत्येक सर्वसामान्य कार्यकर्त्याचा त्याग आहे, असे तानावडे म्हणाले.