ऑनलाईन टीम/तरुण भारत
सांगली: आटपाडी तालुक्यातील एका सभेत माजी मंत्री सदाभाऊ खोत (Sadbhau khot) यांनी गोसावी समाजाच्या केलेल्या उल्लेखाबद्दल अनेकांनी आक्षेप घेतल्याने खोत यांनी दिलगिरी व्यक्त केली आहे. सामाजिक कार्यात काम करताना अठरापगड जातीच्या लोकांना बरोबर घेऊन आपण आंदोलन केले असून कोणत्याही समाजाबद्दल आपली चांगलीच भावना आहे. मात्र आपल्या वक्तव्यातून गोसावी समाजाच्या भावना दुखावल्या असतील तर मी दिलगिरी व्यक्त करीत आहे असे सदाभाऊ खोत यांनी जाहीर केले आहे. याचा व्हिडिओ त्यांनी शेअर केला आहे.
काय म्हणाले सदाभाऊ
अरे आमच्या नादाला कशाला लागता आम्ही फाटकी माणसे आहोत. आमचं गोसाव्यासारखं आहे. माग बी काय नायं आणि फुड बी काय नाय.आम्ही बांबू लावल्याशिवाय राहणार नाही. असे वक्तव्य त्यांनी केलं. त्यांच्या या वक्तव्यावरुन गोसावी समाज आक्रमक झाला आहे. यावर अनेकांनी आक्षेप घेतला. दरम्यान आज सदाभाऊ खोत यांनी दिलगिरी व्यक्त केली आहे. आंदोलन करत असताना सर्व समाजाविषयी चांगली भावना आहे. मात्र आपल्या वक्तव्यातून गोसावी समाजाच्या भावना दुखावल्या असतील तर मी दिलगिरी व्यक्त करतो असे सदाभाऊ म्हणाले.