कवठेपिरान हद्दीत वारणा नदीत मृतदेह आढळलाः हात बांधून नदीत फेकलेः सांगली ग्रामीण पोलिसांकडून तपास सुरूः चारचाकी इचलकरंजी फाटा येथे आढळली
सांगली प्रतिनिधी
मिरज तालुक्यातील तुंग येथून अपहरण झालेल्या बांधकाम व्यावसायिक माणिकराव विठ्ठल पाटील (54, रा. इंद्रनील प्लाझा अपार्टमेंट, राममंदिराजवळ, सांगली ) यांचा खून करण्यात आला आहे. त्यांचा मृतदेह बुधवारी दुपारी कवठेपिरान हद्दीत वारणा नदीत आढळला. सांगली ग्रामीण पोलीसांनी याठिकाणी जावून हा मृतदेह बाहेर काढला असता या मृतदेहाचे हात बांधले असल्याचे समोर आले. त्यामुळे हा खूनच असल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले.
याबाबत अधिक माहिती अशी की, मिरज तालुक्यातील तुंग येथील मिणचे मळा रस्त्यावरील भारत बेंझ शोरूम परिसरातून माणिकराव विठ्ठल पाटील यांचे 13 ऑगस्ट रोजी रात्री साडेआठच्या सुमारास मोटारीसह अपहरण झाल्याची फिर्याद त्यांचा मुलगा विक्रमसिंह पाटील यांनी सांगली ग्रामीण पोलिस ठाण्यात दिली होती. त्यानुसार पोलिसांकडून त्यांचा शोध सुरू होता. त्यांचे मोबाईल लोकेशन तसेच त्यांची चारचाकी गाडी याचाही शोध पोलीसांच्याकडून सुरू असतानाच बुधवारी दुपारी वारणा नदीत एका 50 वर्षीय व्यक्तीचा मृतदेह स्थानिक शेतकऱयांना दिसला. त्यांनी याची माहिती तात्काळ सांगली ग्रामीण पोलिसांना दिली. त्यानंतर पोलिसांनी हा मृतदेह बाहेर काढला असता हा मृतदेह पाटील यांचा असल्याचे समोर आले. हात बांधलेल्या अवस्थेत हा मृतदेह होता. पोलिसांनी पंचनामा करून हा मृतदेह शवविच्छेदनासाठी सांगलीच्या वसंतदादा सर्वोपचार रूग्णालयात नेण्यात आला.
बांधकाम व्यावसायिक माणिकराव पाटील यांचे कोणाशी वैर नव्हते
या प्रकरणाचा पोलिसांनी तात्काळ तपास सुरू केला असता माणिकराव पाटील यांचे कोणाशीही वैर नसल्याचे त्यांच्या कुटुंबियांकडून सांगण्यात आले. तसेच पैशाचे गैरव्यवहार अशा बाबतीतही चौकशी करण्यात आली असता तसेही कोणते कारण नसल्याचे समोर आले आहे. त्यामुळे हा खून कोणी केला आणि कशासाठी केला याचा शोध आता पोलिसांकडून सुरू करण्यात आला आहे.
आष्टा येथून तुंग येथे आले
पाटील हे बांधकाम व्यावसायिक असल्याने सातत्याने ते आष्टा या परिसरात जात होते. त्याठिकाणी एका हॉटेलमध्ये ते थांबलेले असत. 13 ऑगस्ट रोजीही सांयकाळी ते त्याठिकाणी थांबले होते. त्याचवेळी अनोळखी व्यक्तींने त्यांना प्लॉट दाखविण्याचा आहे म्हणून तुंग येथे बोलावून घेतले. रात्री साडे आठ वाजता तुंग येथील भारत बेंझ शोरूमजवळ ते त्यांच्या चारचाकी गाडी क्रमांक एमएच 10 सीएन 6864 मधून आले होते. तेव्हा कोणीतरी अनोळखी व्यक्तींनी ही थांबलेली त्यांची चारचाकी गाडी नेल्याचे सीसीटीव्ही फुटेजमध्ये आढळून आले होते. पण, त्यांचा कोठेही ठावठिकाणा आढळून आला नाही. तसेच त्यांच्या मुलांने अनेकवेळा त्यांना मोबाईल लावला. पण तो ही बंद आढळून आल्याने वडिलांचे अपहरण झाल्याची तक्रार या मुलाने दिली होती.
शवविच्छेदन अहवाल आल्यावरच सखोल तपास ः निरीक्षक गायकवाड
बांधकाम व्यावसायिक पाटील यांचा मृतदेह हात बांधलेल्या अवस्थेत असल्याने हा घातपातच आहे, हे स्पष्ट झाले आहे. पण, त्यांचा खून गळा आवळून झाला आहे की, बुडून झाला आहे. हे आता शवविच्छेदन अहवाल आल्यावरच स्पष्ट होणार आहे. दरम्यान, त्यांचे ज्या परिसरातून अपहरण झाले. तसेच ज्या परिसरात त्यांची चारचाकी आढळून आली आहे याठिकाणचे सीसीटीव्ही फुटेजही पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्यामुळे या लवकरच खूनाचा उलगडा होईल, असे सांगली ग्रामीण पोलीस ठाण्याचे निरिक्षक शिवाजी गायकवाड यांनी सांगितले.