प्रदेश काँग्रेसच्या आदेशानुसार खानापूर तालुक्यात काॅग्रेस ची जनसंवाद यात्रेचे रविवारी (ता. १० ) नियोजन करण्यात आले आहे, अशी माहिती काँग्रेसचे जेष्ठ नेते रवींद्रआण्णा देशमुख यांनी दिली.
रवींद्रआण्णा देशमुख म्हणाले , प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या आदेशानुसार जिल्ह्यात ठिकठिकाणी जनसंवाद यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. खानापूर तालुक्यात रविवारी ( ता. १० ) दुपारी चार वाजता विटा शहरात जनसंवाद यात्रेला प्रारंभ होणार आहे. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, आमदार डॉ. विश्वजीत कदम, काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष विशाल पाटील, जिल्हाध्यक्ष आमदार विक्रमसिंह सावंत यांच्यासह जिल्ह्यातील नेते उपस्थित राहणार आहेत. संपूर्ण विटा शहरातून पदयात्रा काढून त्यानंतर सायंकाळी 7 वाजता शाळा नंबर 2 च्या प्रांगणात जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले आहे.
विठ्ठल साळुंखे म्हणाले, केंद्र सरकारने गेल्या नऊ वर्षांत सामान्य माणसांचे जगणे मुश्कील केले आहे. तरुणांना रोजगार उपलब्ध दिला नाही. शासनाने शेतकऱी विरोधी धोरणे राबवत देशोधडीला लावले आहे. यासह अन्य विषयांवर मार्गदर्शन करण्यात येणार आहे. सामान्य जनतेला काॅग्रेसच्या विचारांशी जोडून घेण्यासाठी जनसंवाद यात्रा काढण्यात आली आहे.
यावेळी काँग्रेस चे विटा शहराध्यक्ष नंदकुमार पाटील, सुरेश पाटील, सयाजी धनवडे, गजानन सुतार, युवा नेते अजित गायकवाड, सुमित गायकवाड, युवक काँग्रेसचे अध्यक्ष अभिजित पाटिल, अशोक साळुंखे, राजाराम साठे, राजू पठाण, प्रवीण पाटील उपस्थित होते.