सांगली प्रतिनिधी
गौरी गणपतीच्या सणात पुनरागमन केलेल्या पावसाची संततधार अजूनही सुरूच आहे. धरणांच्या पाणलोट क्षेत्रात मुसळधार सुरू आहे. तर जिल्हयात सर्वत्र कमी जास्त प्रमाणात पावसाने हजेरी लावली आहे. त्यामुळे दुष्काळी भागातील ओढे नाले भरून वाहू लागले आहेत. बहुतांशी तलाव प्रथमच भरले असून धरणेही तुडूंब भरल्याने आजपासून कोयनेतून 1050 क्युसेक विसर्ग पुन्हा सुरू करण्यात आला आहे.
कोयना धरणात सोमवारी सायंकाळी 100.92 टीएमसी तर वारणा धरणात 33.61 टीएमसी साठा झाला आहे. पाणलोट क्षेत्रात मुसळधार सुरूच असून गेल्या चोवीस तासात कोयना धरण परिसरात 79 ,वारणा परिसरात 124 मिमी पावसाची नोंद झाली आहे. महाबळेश्वर आणि नवजा परिसरातही जोरदार पाऊस सुरू आहे. दरम्यान, जिह्यात शिराळा तालुक्यात सर्वाधिक 37.3 मिमी पावसाची नोंद झाली आहे. तर इस्लामपूरमध्ये 26.8, पलूस मध्ये 3.3, सांगलीत एक, विटा 19, आटपाडी 4.5, कवठेमहांकाळमध्ये 5.5, जत मध्ये 17.5 आणि कडेगाव तालुक्यात 9.3 मिमी पावसाची नोंद झाली आहे.
यापुर्वी ऑगस्टमध्ये जिह्यात सर्वत्र जोरदार पाऊस झाला होता. महापुराच्या भीतीने नदीकाठच्या परिसरात स्थलांतरही सुरू करण्यात आले होते. अलमट्टी, कोयना आणि वारणेचा विसर्ग ,फुगवटा चर्चेत आला होता. परंतू त्यानंतर पावसाचा जोर ओसरल्याने महापुराची चर्चाही थांबली. परंतू गेल्या आठ दहा दिवसांपासून पुनरागमन केलेल्या पावसाने जिह्यात सर्वत्र हजेरी लावली आहे. ऊन आणि पावसाचा खेळ सुरू आहे. पण, ऊन पडलेले असतानाच अचानक जोरदार पाऊस कोसळतो. त्यामुळे शेतकऱयांसह नागरिकांची चांगलीच दमछाक सुरू आहे.
दरम्यान, या पावसामुळे जमिनीतील पाण्याची पातळी चांगली वाढली आहे. ओढे, नाल्यांना पाणी सुरू झाले असून दुष्काळी पट्टयातील बहुतांशी तलाव भरले आहेत. सततच्या पावसामुळे शेतीची कामे खोळंबली आहेत.
धरणातील पाणीसाठा आणि विसर्ग पुढीलप्रमाणे
विविध धरणातील पाणीसाठा व साठवण क्षमता कंसात टी.एम.सी. प्रमाणात पुढीलप्रमाणे. कोयना 100.92 (105.25), धोम 12.98 (13.50), कण्हेर 9.91 (10.10), वारणा 33.40 (34.40), दूधगंगा 22.29 (25.40), राधानगरी 8.27 (8.36), तुळशी 3.44 (3.47), कासारी 2.72 (2.77), पाटगांव 3.72 (3.72), धोम बलकवडी 3.89 (4.08), उरमोडी 9.68 (9.97), तारळी 5.60 (5.85), अलमट्टी 122.66 (123).
विविध धरणातून सांडवा, कालवा व विद्युतगृहाव्दारे सोडलेला विसर्ग क्युसेक्समध्ये पुढीलप्रमाणे. कोयना – 1050, धोम – निरंक, कण्हेर – 611, वारणा – निरंक, दुधगंगा – 900, राधानगरी- 4456, तुळशी – 250, कासारी – 550, पाटगांव – 3097, धोम बलकवडी – निरंक, उरमोडी – निरंक, तारळी – निरंक व अलमट्टी धरणातून 52 हजार 500 क्युसेक विसर्ग सुरु आहे.