बोरगावच्या दोन तरुणांचा मराठा आरक्षणासाठी अनोखा प्रवास
प्रतिनिधी/ सातारा
मराठा समाजाला आरक्षण मिळावे, समाजातील तरुणतरुणींना सरकारी नोकरी मिळावी, चांगले शिक्षण मिळावे, चांगले शिक्षण मिळाले, चांगली नोकरी मिळाली तर आर्थिक स्तर उंचावेल. यासाठी सातारा तालुक्यातील बोरगाव येथील दोन ध्येयवेडे मराठा समाजाच्या तरुणांनी राजधानी सातारा ते मुंबई मंत्रालय असा चालत प्रवास सुरु केला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना निवेदन देण्यासाठी हा अनोखा पायी प्रवास सुरु केला आहे.
मराठा समाजाला आरक्षण मिळावे म्हणून 2016 मध्ये राज्यात 56 मोर्चे निघाले होते. साताऱयातील मोर्चाला सुमारे 30 लाख मराठे जमले होते. परंतु त्यावेळी दिलेले आरक्षण न्यायालयात टिकले नाही. त्यामुळे मराठा समाजातील तरुणांच्या आशेची निराशा झाली. पुन्हा आरक्षणाची धार वेगवेगळय़ा स्वरुपात सुरु असते. सातारा तालुक्यातील बोरगाव येथील प्रकाश साळुंखे आणि दत्ता ढाणे या दोघांनी बोरगाव ते सातारा, सातारा ते मुंबई असा पायी प्रवास दि. 7 पासून सुरु केला आहे. मुंबईत जावून ते मुख्यमंत्र्यांना निवेदन देणार आहेत. त्यांचा हा प्रवास संपूर्णपणे चालत असा असणार आहे, दि. 14 रोजी मंत्रालयात मुख्यमंत्र्यांना निवेदन देणार आहे, असे ढाणे यांनी सांगितले.