सातारा प्रतिनिधी
लडाखमधील श्योक नदीत बस कोसळून झालेल्या अपघातात भारतीय लष्कराचे सात जवान शुक्रवारी शहीद झाले. त्यात सातारा जिल्ह्यातील विसापूर येथील सुभेदार विजय सर्जेराव शिंदे यांना वीरगती प्राप्त झाल्याने संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे. आज त्यांचे पार्थिव विसापूर गावात दाखल झाले. सुभेदार विजय यांच्या धक्कादायक आणि दुर्दैवी मृत्यूची बातमी समजल्यापासून विसापूर आणि पंचक्रोशीवर दुःखाची छाया पसरली आहे. गावकरी पाणावलेल्या डोळ्यांनी सुभेदार विजय शिंदे यांच्या पार्थिवाची वाट पाहत होते. दहशतवाद्यांची नजर चुकवण्यासाठी भारतीय लष्कराचे जवान खाजगी बसने प्रवास करत होते. देशसेवेचे कर्तव्य बजावताना झालेल्या बस अपघातात सात जवान शहीद झाल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
सुभेदार विजय शिंदे यांचे पार्थिव आज सकाळी आकरा वाजता विसापूर येथे आणण्यात आले. अंत्यदर्शनासाठी काही काळ पार्थिव विजय यांच्या निवासस्थानी ठेवण्यात आले आहे. त्यानंतर गावातून सुभेदार विजय शिंदे यांची अंत्ययात्रा काढण्यात येणार आहे. लष्करी इतमामात लष्करी इतमामात त्यांच्यावर अंतिम संस्कार करण्यात येणार आहे.
सुभेदार विजय शिंदे हे 1998 मध्ये 22 मराठा लाईट इन्फंट्रीत भरती झाले होते. गेल्या चोवीस वर्षांत त्यांनी विविध ठिकाणी देशसेवेचे कर्तव्य बजावले होते त्यांचे वडील ही लष्करात होते तर एक भाऊ लष्करात सेवा बजावत आहे. सुभेदार विजय शिंदे यांच्या पश्चात आई, पत्नी आणि दोन मुली असा परिवार आहे. विसापूर गावांमधील अडीचशे ते तीनशे जवान लष्करात आहेत. देशसेवेचे बाळकडू गावातूनच मिळत असल्याने दरवर्षी अनेक तरुण लष्करात भरती होत आहेत.