प्रतिनिधी /सांगे
पीपीपी तत्त्वावर इथेनॉल उत्पादनासह संजीवनी साखर कारखाना चालवण्यासंबंधी आरएफक्यू मागवणारी निविदा जारी झाल्याबद्दल ऊस शेतकरी सुविधा समितीचे अध्यक्ष ऍड. नरेंद्र सावईकर यांनी समाधान व्यक्त केले आहे. दोन वर्षांपूर्वी राज्य सरकारने सावईकर यांच्या अध्यक्षतेखालील या समितीची स्थापना केली होती.
त्यानंतर कारखाना चालू करण्यासंबंधी किंवा इतर कोणते पर्याय असू शकतात याचा समितीने विचार सुरू केला. आव्हाने होतीच व आहेतही. अशा प्रकारच्या कामात टीका-टिपणी होणे स्वाभाविक आहे. गोव्याची जमीन ऊस उत्पादनाला पूरक नसली, तरी ऊस पीक घेता येते हे सिद्ध झाले आहे. कारखान्यामुळे धारबांदोडा, सांगे, केपे, काणकोण, सत्तरी व पेडणे भागांतील सुमारे 2000 शेतकऱयांनी कधी ना कधी ऊस लागवड केली आहे. कालांतराने ही संख्या कमी होत गेली. आज साधारणपणे 600 शेतकरी हे पूर्णपणे ऊस उत्पादनावर अवलंबून आहेत, असे सावईकर यांनी स्पष्ट केले.
समितीने सर्व बाबींचा विचार केला. इथेनॉल उत्पादन करणाऱया उगार साखर कारखान्याला भेट तर दिलीच, शिवाय या उद्योगात असलेल्या इतर काही उत्पादकांशी चर्चा केली. त्यांची मते जाणून घेतली. इथेनॉल उत्पादन वाढीसाठी केंद्र सरकारने जाहीर केलेल्या धोरणाचा अभ्यास केला. सर्व परिस्थितीचा विचार करून समितीने सरकारला अहवाल सदर केला होता, असे त्यांनी स्पष्ट केले. त्यातील इथेनॉल उत्पादनाच्या पर्यायावर सर्वांची सहमती झाली. त्यातूनच ही निविदा जारी झाली आहे, असे सावईकर यांनी सांगितले.
ऊस उत्पादन 20000 टनांवर पोहोचलेले असताना इथेनॉल कसे करणार इत्यादी प्रश्न उपस्थित होणे स्वाभाविक आहे. पण जोपर्यंत उपाय किंवा पर्याय तयार होत नाही तोपर्यंत शेतकरी तरी ऊसाची लागवड का व कसे करणार. जमणारच नाही, शक्मयच नाही असे म्हणत स्वस्थ बसलो, तर काहीही होणार नाही, असे ते म्हणाले. जी निविदा जारी झाली आहे त्याला योग्य प्रतिसाद मिळेल अशी अपेक्षा सावईकर यांनी व्यक्त केली. त्याचप्रमाणे आवश्यक परवानग्या मिळून प्रकल्प लवकर कार्यान्वित होवो, अशी आशा त्यांनी व्यक्त केली.
प्रकल्प होण्यात शेतकऱयांचे भले तर आहेच, पण सोबत हातांना काम देखील मिळेल. या सर्व प्रक्रियेत मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, ऊस उत्पादक सुविधा समितीच्या सदस्यांनी स्वतःचा वेळ व पैसा खर्च करून फार मोलाचा सहभाग व सहकार्य दिल्याचे त्यांनी सांगितले. याकामी उगार शुगर वर्क्सचे 90 वर्षांचे मालक राजाभाऊ शिरगावकर यांचे प्रोत्साहन व मार्गदर्शन, तत्कालीन प्रशासक चिंतामणी पेरणी यांचे मोलाचे सहकार्य लाभले, याचा सावईकर यांनी उल्लेख केला.