वृत्तसंस्था/ कोलंबो
यजमान भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तीन सामन्यांच्या वनडे मालिकेला 22 सप्टेंबरपासून मोहालीत प्रारंभ होत आहे. या मालिकेसाठी भारतीय संघातील प्रमुख फलंदाज श्रेयस अय्यर आणि सूर्यकुमार यादव यांची सत्त्वपरीक्षा ठरणार आहे.
ऑक्टोबर महिन्यात आयसीसीची विश्वचषक क्रिकेट स्पर्धा सुरु होत असल्याने यजमान भारत आणि ऑस्ट्रेलिया या दोन्ही संघांना ही मालिका शेवटची सरावाची राहिल. या मालिकेत श्रेयस अय्यरच्या तंदुरुस्तीवर तसेच सूर्यकुमार यादवच्या फलंदाजीवर निवड समितीचे अधिक लक्ष राहिल. गेल्या काही दिवसापासून श्रेयस अय्यरला तंदुरुस्तीची समस्या सातत्याने भेडसावत आहे. श्रेयस अय्यरने रविवारी येथे लंकेविरुद्धच्या अंतिम सामन्यापूर्वी सुमारे अर्धातास शारीरिक व्यायाम आणि काही कालावधी नेटमध्ये फलंदाजीचा सराव केला. पण त्याला या अंतिम सामन्यासाठी संघ व्यवस्थापनाने अंतिम 11 खेळाडूत स्थान दिले नाही. पाठ दुखापती समस्येमुळे अय्यरला या स्पर्धेच्या पाकविरुद्ध झालेल्या सामन्याला मुकावे लागले होते.
संघ व्यवस्थापन आणि निवड समिती यांचा सूर्यकुमार यादववर आजही पुष्कळचा विश्वास असल्याचे जाणवते. क्रिकेटच्या टी-20 प्रकारातील स्फोटक फलंदाजीनंतर सूर्यकुमारला वनडे प्रकारात आपली कामगिरी म्हणावी तशी पार पाडता आलेली नाही. बांगलादेशविरुद्धच्या गेल्या शुक्रवारच्या सामन्यात सूर्यकुमारने 34 चेंडूत 26 धावा जमवल्या होत्या. या सामन्यात सूर्यकुमार ज्या पद्धतीने बाद झाला त्यामुळे त्याला आता संघातील स्थान टिकवण्यासाठी आपल्या फलंदाजीच्या तंत्रात बदल करावा लागेल. सध्या केएल राहुल आणि इशान किसन यांची फलंदाजी सूर्यकुमारच्या तुलनेत अधिक सरस असल्याचे निवड समितीला जाणवते. त्यामुळे सूर्यकुमार आणि अय्यर यांची नजीकच्या काळात सत्त्वपरीक्षा ठरेल.