ऑनलाईन टीम / तरुण भारत :
इंदापुरात विहिरीचे बांधकाम करताना रिंग पडून मातीच्या ढिगाऱ्याखाली गाडले गेलेल्या चार मजुरांचा शोध अद्याप लागला नाही. एनडीआरएफच्या पथकाकडून आज चौथ्या दिवशीही या मजुरांचा शोध युद्धपातळीवर सुरू आहे.
मंगळवारी रात्री इंदापूर तालुक्यातील म्हसोबावाडीत विहिरीचे काम करताना रिंग ढासळल्याने सोमनाथ लक्ष्मण गायकवाड (वय 32), जावेद अकबर मुलाणी (वय 30), परशुराम चव्हाण (वय 30), मनोज मारुती चव्हाण (वय 40) हे चार मजूर ढिगाऱ्याखाली गाडले गेले. या मजुरांना बाहेर काढण्यासाठी एनडीआरएफने तात्काळ काम हाती घेतले होते. मात्र, अद्यापही या मजुरांचा शोध लागलेला नाही. sहे सर्व मजूर इंदापूर तालुक्यातील बेलवाडी येथील रहिवाशी आहेत.
स्थानिक प्रशासनाच्या मदतीने एनडीआरएफचे पथक घटनास्थळी तळ ठोकून आहे. सहा पोकलेन मशिनच्या साह्याने विहिरीच्या बाजूचा मातीचा ढिगारा हटविण्यात येत आहे. ही विहीर जवळपास 100 फूट खोल आणि 1200 फूट व्यास असलेली आहे. कामगारांच्या शोधण्यासाठी एनडीआरएफकडून शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत.