जत, प्रतिनिधी
Sangli News : महाराष्ट्र- कर्नाटक सिमेवर असलेल्या जत पूर्व भागात भयावह दुष्काळ पडला आहे.जतला कर्नाटकातील तुबची बबलेश्वर योजनेतून पाणी सोडावे अशी मागणी कर्नाटकचे विद्यमान उद्योग मंत्री एम. बी.पाटील यांनी कर्नाटकचे उपमुख्यमंत्री तथा जलसंपदा मंत्री डी.के.शिवकुमार यांच्याकडे केली आहे.
११ जुलै रोजी आ.विक्रमसिंह सावंत यांनी कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डी.के.शिवकुमार तसेच उद्योग मंत्री एम.बी.पाटील यांची भेट घेत दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर मानवतेच्या दृष्टीकोनातून, जत पूर्व भागात तुबची बबलेश्वरचे जत पूर्व भागात कर्नाटकातील तुबची बबलेश्वर योजनेतून पाणी सोडावे अशी आग्रही मागणी केली होती.सावंत यांच्याशी तीस मिनीटे या विषयावर मंत्री शिवकुमार यांनी चर्चा झाली होती. त्यानंतर एम.बी.पाटील यांनी नुकतेच जत तालुक्यास पाणी देण्यासाठी मोठा पाठपुरावा सुरु केला आहे.विक्रम सावंत यांचा सतत पाठपुरावा आणि तळमळ पाहत थेट कर्नाटक मंत्रीच त्यांना साथ देत आहेत.त्यामुळं एक प्रकारे सावंत यांचा कर्नाटक मंत्री मंडळात ही मोठा दबदबा असल्याचे स्पष्ट दिसत आहे.
दरम्यान,कर्नाटक सरकार जत तालुक्यास पाणी देण्यासाठी सकारात्मक असून, आम्ही यासंदर्भात महाराष्ट्र सरकारशी पत्र व्यवहार करू.तसेच यापूर्वी दोन्ही राज्यात काय काय अहवाल सादर झाला आहे,त्याचाही अभ्यास करून किमान मानवतेच्या भूमिकेतून एकमेकांना मदत होईल या दृष्टीनेही प्रयत्न करण्यात येतील असे सांगितले शिवाय तशा प्रकारच्या सुचनाही त्यांनी जलसंपदा विभागाला दिल्या होत्या.याच अनुषगाने एम.बी. पाटील यांनी डी. के. शिवकुमार यांच्याकडे पत्र पाठवत जतला पाणी सोडण्याचे आदेश संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना द्यावे अशी मागणी केली आहे. पाटील यांनी शिवकुमार यांना पत्र पाठवून जतच्या पाण्यासंदर्भात मागणी केल्याने जत पूर्व भागातील शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.
सावंतांनी अधिवेशनात सरकारला धरले धारेवर
जत पूर्व भागाला पाणी मिळावे यासाठी आपण कर्नाटकचे उपमुख्यमंत्री तथा जलसंपदा मंत्री डी.के.शिवकुमार व उद्योग मंत्री एम.बी.पाटील यांना ११ जुलैला भेटलो व कर्नाटकातील तुबची बबलेश्वर योजनेतून पाणी देण्याची मागणी केली.या मागणीची दखल घेत कर्नाटक सरकारने जतला पाणी सोडले.एका बाजूला महाराष्ट्रातील लोकप्रतिनिधीनी केलेल्या मागणीची दखल कर्नाटक शासन घेते पण याउलट महाराष्ट्र शासन या मागणीची दखल घेण्यास तयार नाही ही शोकांतिका असल्याचे सांगत सावंत यांनी आपली नाराजी व्यक्त करत अधिवेशनात सरकारला चांगलेच धारेवर धरले.