ऑनलाईन टीम/तरुण भारत
पत्राचाळ घोटाळ्या प्रकरणात शरद पवार (Sharad Pawar) यांचाही सहभाग असून त्यांची चौकशी करण्यात यावी अशी मागणी भाजपचे आमदार अतुल भातखळकर (Atul Bhatkhalkar) यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून केली होती. याप्रकरणी शरद पवार यांनी आज पत्रकार परिषद घेत चौकशी करायची असेल तर लवकर करा, पण आरोप खोटे ठरल्यास त्यांच्यावर काय कारवाई करणार, असा सवाल राज्य सरकारला शरद पवारांनी केला.
भाजपचे आमदार अतुल भातखळकर यांनी पत्राचाळ प्रकरणी शरद पवारांची चौकशी करावी अशी मागणी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून केली होती. याला भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनीही त्याला दुजोरा दिला होता. यावरून राजकीय आरोप प्रत्यारोप सुरू झाले आहेत. या आरोपांवर राष्ट्रवादी कॉँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी थेट उत्तर दिले आहे. शरद पवारांनी भातखळकरांनी केलेले आरोप फेटाळले आहेत. ज्या बैठकीचा विरोधक उल्लेख करत आहे, त्या बैठकीचा इतिवृत्तांत त्यांनी सादर केला असून त्यावर प्रधान सचिव स्वाधीन क्षत्रिय यांची स्वाक्षरी असल्याचे त्यांनी सांगितले आहे. हे सर्व आरोप त्यांनी फेटाळले असून त्यांनी राज्य सरकारला आव्हान दिल आहे, जर सरकारला चौकशी करायची असेल तर त्यांनी ती लवकरात लवकर करावी. चौकशीला नाही म्हणण्याची भूमिका आमची नाही जर चौकशी चुकीची निघाली तर तुम्ही काय कारवाई करणार हे देखील लागलंच जाहीर करावे असे आव्हान शरद पवार यांनी केले.
हे ही वाचा : पत्राचाळ घोटाळा प्रकरणी शरद पवारांची चौकशी करा – अतुल भातखळकर
या पत्रकार परिषदेला जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) उपस्थित होते. या वेळी शरद पवारांनी १४ जानेवारी २००६ रोजी बैठक घेतली. या बैठकीत सर्व अधिकारी आणि संबंधित लोकं उपस्थित होते असे जितेंद्र आव्हाडांनी सांगितले. पत्राचाळ प्रकरणात शरद पवारांनी बैठक घेतली यात नवल काय असा सवाल करत राज्यातील विविध प्रश्नी अनेक बैठका शरद पवार यांनी घेतल्या होत्या. चर्चा करुन संवाद साधणे आणि मध्य मार्ग काढणे हाच हेतू त्या बैठकीत होता, असे आव्हाड म्हणाले. राज्याचे माजी मुख्य सचिव स्वाधीन क्षत्रिय तत्कालीन गृहनिर्माण विभागाचे सचिव होते. त्यांनी या बैठकीचे इतिवृत्त असल्याचे आव्हाड यांनी सांगितले. या बैठकीत कोणताही निर्णय झाला नसल्याचे त्यांनी सांगितले. या बैठकीत सरकार निर्णय घेईल असे मत शरद पवार यांनी व्यक्त केले होते. संवाद साधून मार्ग काढण्याचा प्रयत्न राजकीय नेत्यांचा असतो. तेच या प्रकरणात झाल्याचे आव्हाड यांनी म्हटले. या प्रकरणात चौकशी करावी. त्याला आमचा विरोध नाही. मात्र, भाजपकडून पराचा कावळा करण्यात येत असल्याचे आव्हाडांनी सांगितले.
ग्रामपंचायत निवडणूक निकालावरूनही शरद पवार यांनी भाजपला फटकारले. राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या सर्वाधिक १७७ जागा निवडून आल्या आहेत. भाजप जो आकडा सांगत आहे तो चुकीचा आहे. जर त्यांना वाटत असेल त्यांच्या जास्त जागा आल्या आहेत तर त्यांनी त्यात आनंदात राहावे असा टोलाही त्यांनी लगावला. शिंदे सरकारने महाविकास आघाडीने केलेलेल्या अनेक योजना बंद केल्या आहेत. त्यातील कोरोना काळातील मृत कुटुंबियांच्या नतेवाईकांना देण्यात येणारे अनुदान बंद करण्यात आले आहे. यामुळे राज्यात शिंदे सरकार विरोधात असंतोष आहे, असेही पवार म्हणाले.
निर्मला सीतारमण यांच्या दौऱ्याबद्दल पवार म्हणाले, सीतारमण यांच्या दौऱ्याचे सुप्रिया सुळे यांनी आधीच स्वागत केले आहे. कोणी कुठे जावे याचे प्रत्येकाला स्वातंत्र्य आहे. त्यांनी खुशाल बारामतीत यावे. त्यांचे स्वागत आहे. आज भाजप विरोधात देशात वातावरण आहे. यामुळे ते काही मतदार संघावर लक्ष केंद्रित करत आहे. यातूनच हा अट्टहास केला जात आहे. देशात भाजप विरोधात सर्व विरोधकांना एकत्र आणण्याचा प्रयत्न केला जात आहे. असे झाले तर नक्कीच चांगले होईल आणि भाजपला पर्याय उभा होईल असे वाटते असेही पवार म्हणाले.