वृत्तसंस्था/ मुंबई
भारतीय क्रिकेट संघ सध्या बांगलादेशच्या दौऱयावर कसोटी मालिका खेळत आहे. या मालिकेतील दुसरी कसोटी 22 डिसेंबरपासून मिरपूर येथे सुरु होणार आहे. या दुसऱया कसोटीत कर्णधार रोहित शर्मा खेळण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
बांगलादेश विरुद्ध झालेल्या वनडे मालिकेत कर्णधार रोहित शर्माच्या हाताच्या अंगठय़ाचे हाड दुखावल्याने तो कसोटी मालिकेतील पहिल्या सामन्यासाठी उपलब्ध होऊ शकला नाही. रोहितच्या या दुखापतीवर तातडीने उपचार करण्यात आले असून आता ही दुखापत बरी होण्याच्या मार्गावर असल्याचे सांगण्यात आले. दुसऱया कसोटीपूर्वी तो या दुखापतीतून पूर्णपणे बरा होईल आणि तो या शेवटच्या कसोटीत खेळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. रोहित शर्माच्या गैरहजेरी भारताचे नेतृत्व के. एल. राहुलकडे सोपविण्यात आले असून नवोदित अभिमन्यू ईश्वरनला संघात संधी देण्यात आली आहे. पहिल्या कसोटीत ईश्वरनला अंतिम 11 खेळाडूत स्थान मिळू शकले नाही. तो अद्याप कसोटी पदार्पणासाठी वंचित आहे. ईश्वरनने आपल्या क्रिकेट कारकिर्दीत आतापर्यंत 78 प्रथमश्रेणी सामन्यात 45.33 धावांच्या सरासरीने 5576 धावा जमाविल्या आहेत.