राजस्थानातील प्रतिसादाने राहुल गांधी भारावले
जयपूर / वृत्तसंस्था
कन्याकुमारीपासून सुरू झालेल्या काँग्रेसच्या भारत जोडो यात्रेचे 100 दिवस पूर्ण झाले आहेत. सध्या ही पदयात्रा राजस्थानात असून या यात्रेचे नेतृत्त्व करणारे काँग्रेस नेते राहुल गांधी शुक्रवारी जयपूरमध्ये एका संगीत कार्यक्रमात सहभागी झाले होते. तसेच त्यांनी पहिल्यांदाच राजस्थानमध्ये पत्रकार परिषदही घेतली. शुक्रवारी दौसा परिसरात 22 किलोमीटरचा पायी प्रवास केल्यानंतर राहुल गांधी दुपारी 1.30 वाजता जयपूरला पोहोचले. याप्रसंगी हेलिकॉप्टरमध्ये त्यांच्यासोबत मुख्यमंत्री अशोक गेहलोत, हिमाचलचे मुख्यमंत्री सुखविंदर सिंग सुक्खू आणि सचिन पायलट होते.
राजस्थानमधील भारत जोडो यात्रेचा शुक्रवारी 12 वा दिवस आहे. दौसा येथील यात्रेदरम्यान सचिन पायलटच्या समर्थनार्थ राहुल गांधींसमोर जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. दौसा जिल्हा हा पायलट कुटुंबाचा बालेकिल्ला मानला जातो. काँग्रेसचे नेते राजेश पायलट हे येथील सर्वात लोकप्रिय नेत्यांपैकी एक होते. सचिन पायलट आता इथून निवडणूक लढवत नसले तरी ते येथे येत असतात. सध्या पायलट समर्थक नेते मुरारीलाल मीणा हे दौसा विधानसभेचे आमदार आहेत.
‘भारत जोडो’ यात्रेने शुक्रवारी दौसा जिह्यात 22 किलोमीटरचे अंतर कापले. आज यात्रेच्या संपूर्ण मार्गावर मोठी गर्दी दिसून आली. हजारो लोक राहुल आणि यात्रेच्या समर्थनार्थ घोषणाबाजी करताना दिसले. गर्दीमुळे प्रवासाचा वेग खूपच कमी होता. प्रचंड गर्दीमुळे पहिला टप्पा नियोजित वेळेपेक्षा उशिरा पूर्ण झाला. दौसा येथील पदयात्रेचा प्रवास संपल्यानंतर दुपारी राहुल गांधी जयपूरमध्ये गेले. 16 रोजी जयपूरमध्ये रात्रीची विश्रांती घेतल्यानंतर 17 डिसेंबर रोजी सकाळी ते शिबिरात परततील. 17 डिसेंबरला पदयात्रेसाठी सुट्टी असेल.